फाईव्ह जी तंत्रज्ञान

  • फाईव्ह जी तंत्रज्ञान

    फाईव्ह जी तंत्रज्ञान

    • 16 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 26 Views
    • 0 Shares
     फाईव्ह जी तंत्रज्ञान
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात माहिती तंत्रज्ञानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ५ जी तंत्रज्ञानव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न  याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान :
        कम्युनिकेशन, नेटवर्किंग-वायर्ड / वायरलेस, इंटरनेट
        सुरक्षा - नेटवर्क आणि माहिती सुरक्षा

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    फाईव्ह जी तंत्रज्ञान
     
    *   ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान आरोग्यासाठी धोक्याचे आहे, असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावला. ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे काय बदल होणार याबद्दल कुतूहल आहे. पण, त्याचवेळी या तंत्रज्ञानाकडे संशयाने पाहणार्यांची संख्याही जगात वाढते आहे.
     
    *   फाईव्ह जी ही मोबाईल तंत्रज्ञानाची पाचवी पिढी. मागच्या चार दशकांत चार पिढ्या पाठीमागे पडत ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने जगभरात बाळसं धरलं आहे. मोबाईल तंत्रज्ञानाच्या पहिल्या चारही पिढ्यांनी माणसाच्या जगण्यावर अनेक चांगले-वाईट परिणाम केले. त्याचे अनेक फायदे आणि तोटेही आपण अनुभवले. भारतालाही या नव्या तंत्रज्ञानाचं, कमालीचं आकर्षण आहे.
     
    *   ‘फोर जी’ तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल झाले. जागतिक खेडी नावाची संकल्पना यामुळे प्रत्यक्षात आली. इतकंच काय तर कोरोनाकाळात साधारण ६० टक्के लोकांचा रोजगार याच तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर  ‘फाईव्ह जी’मुळे जगात होणार्या बदलांविषयी कुतूहल असतानाच या नव्या तंत्रज्ञानाकडे संशयाने पाहणार्यांची संख्याही कमी नाही.
     
    *   दिल्ली उच्च न्यायालयात ‘फाईव्ह जी’चं हे प्रकरण गाजलं. प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे आरोग्याला होणार्या  धोक्यांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचं असं मत होतं की, माणूस सातत्यानं प्रगती करतोय. पण, त्या प्रगतीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार करायला हवा. सध्या देशात ‘फाईव्ह जी’ नेटवर्कचं काम सुरू करण्याची चर्चा आहे. पण, त्या नेटवर्कचा आपल्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार याचाही विचार व्हायला हवा.’
     
    *   दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत २० लाखांचा दंड ठोठावला. याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आणि न्यायालयाची सुनावणी चालू असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या सर्व कारवाईत एक गोष्ट मागे सुटली ती म्हणजे खरंच ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान आरोग्याला घातक आहे का? जगभरातले लोक या मोबाईल तंत्रज्ञानाच्या पाचव्या पिढीविषयी इतके साशंक का आहेत?
     
        जगभर अफवांचं पेव -
     
    *   जग कोरोनाशी लढत असताना अनेक युरोपियन देशात ‘स्टॉप फाईव्ह जी’ नावाने आंदोलन चालू झालं. ब्रिटनमधल्या डर्बी शहरात लोकांनी फाईव्ह जी टॉवर पाडून पेटवून दिले. या तंत्रज्ञानासाठी उभ्या केलेल्या अनेक पायाभूत सुविधांना लक्ष्यही केलं. इतकंच काय त्यांनी ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाची उभारणी आणि दुरुस्तीचं काम करणार्या कर्मचार्यावर हल्ले केले.
     
    *   ‘फाईव्ह जी’मुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि कोरोनाचा धोका अधिक वाढतो, अशी त्यांची समजूत होती. शिवाय, ‘फाईव्ह जी’ लहरींमधून कोरोना अधिक जलदगतीने पसरतो, असंही त्यांचं मत होतं. त्यात कोणतंही सत्य नाही. मात्र, अमेरिकेतला प्रसिद्ध अभिनेता वुडी हॅरेलसन याने या चळवळीला पाठिंबा दिलाय.
     
    *   आज संपूर्ण जग तंत्रज्ञानातील प्रगतीच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे तंत्रज्ञानात कमालीचं परिवर्तन पाहायला मिळतंय. रोबोटिक, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मानवविरहित वाहनं या क्षेत्रात बदलाचे जोरदार वारे वाहताहेत. सर्व जग लॉकडाऊनमध्ये असताना ज्या काही आर्थिक घडामोडी चालू होत्या. त्या याच तंत्रज्ञानाच्या आधारे चालू होत्या. मुळात हे सर्व तंत्रज्ञान ‘फोर जी’ वायरलेस नेटवर्कवर आधारलेले आहे. ‘फोर जी’च्या मर्यादा लक्षात घेऊन ‘फाईव्ह जी’साठी सर्वच देशांनी पुढाकार घेतला आहे. भारतही याला अपवाद नाही.
     
        ‘फाईव्ह जी’मुळे नवं विश्‍व -
     
    *   १९८० चं दशक ‘अ‍ॅनॉलॉग वाईस’ प्रणालीचं होतं. १९९० च्या दशकात ‘डिजिटल वाईस’ प्रणाली विकसित झाली. २००० च्या दशकात मोबाईल इंटरनेटचा जन्म झाला. मोबाईल कम्प्युटिंग आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन या वेगवान प्रणालीमुळे संपूर्ण जग जवळ आलं. २०१० च्या दशकात फोर जी आलं आणि मोबाईल तंत्रज्ञानानं  मोठी झेप घेतली.
     
    *   एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया, ई कॉमर्स, मॅपिंग, पेमेंट गेट वे यांचा अतिशय प्रभावी वापर चालू झाला. भविष्यात स्वयंचलित वाहनं, ड्रोनद्वारे डिलिव्हरीसारखे यांत्रिक बदल होतीलच, शिवाय मेडिकल अ‍ॅप रुग्णांच्या सर्वसामान्य आजारांचं निदान करून त्यावर उपचारही करतील. ‘फाईव्ह जी’ मुळे एक नवीन विश्व निर्माण होईल.
     
        अनेक शास्त्रज्ञ साशंक -
     
    *   मानवी आयुष्यावर आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने इतके मोठे परिणाम होणार असतील तर त्याचे दुष्परिणाम होतील का, याचा विचारही करायला हवा. अनेक शास्त्रज्ञही नवीन तंत्रज्ञानाविषयी साशंक आहेत. अमेरिकेतल्या ‘आरटी अमेरिका’ या संस्थेने तर ‘मानवतेवरचे अश्लाघ्य प्रयोग’ असं म्हणून टीका केली आहे. अभिनेत्री जुही चावला यांनीही आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, अशी शंका उपस्थित केली. अनेक लोकांनी फाईव्ह जीचे परिणाम मानवी शरीरावर विशेषतः मेंदूवर, मज्जासंस्थेवर, रक्ताभिसरणावर होतात. फाईव्ह जीमुळे मोठ्या प्रमाणावर टॉवर मानवी वस्तीत उभे करावे लागतील त्यामुळे हे परिणाम अधिक व्यापक होत जातील, अशी भीती व्यक्त केलीय.
     
        ‘फाईव्ह जी’मुळे अर्थव्यवस्थेला गती ?
     
    *   जगातल्या अनेक शास्त्रज्ञ मानवी शरीराच्या दृष्टीने फाईव्ह जी पूर्णपणे सुरक्षित आहे, असं सांगतात. अजूनही जगभरात या तंत्रज्ञानावर संशोधन चालू आहे. भारतही पुढच्या ३ वर्षांत स्वतःचे फाईव्ह जी तंत्रज्ञान निर्माण करतोय. ‘फाईव्ह जी’ सारख्या तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे  भविष्यात आपणाला अनेक संधी मिळणार आहेत. शिवाय, अनेक रोजगाराच्या संधीही या क्षेत्रात वाट पाहत आहेत. ‘फोर जी’सारख्या अद्ययावत मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये वाढ करता येते हे आकडेवारीने सिद्ध झालंय.
     
    *   ‘फाईव्ह जी’मुळे भारतात १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, असे आकडे आहेत. त्यामुळे फाईव्ह जीच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याची ही योग्य वेळ आहे. २०१८ ला संसदीय समितीच्या अहवालात म्हटलंय की, भारताने फाईव्ह जी मोबाईल तंत्रज्ञानाची बस चुकवली. तेव्हा आता आणखी वेळ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
     
        प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान -
     
    *   फाईव्ह जीमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याची हानी होते का किंवा हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे का? हे जसं आपण पाहतोय तसेच या तंत्रज्ञानामुळे अकुशल किंवा कमी कौशल्य असलेल्या रोजगारावर गदा येईल का? भविष्यात आजच्या तरुणांकडे कोणती कौशल्यं असायला हवीत? डिजिटल असमानता वाढेल का? या टेक्नॉलॉजीची फारशी ओळख नसलेल्या लोकांची गोपनीयता धोक्यात येईल का? तसंच भारतीय समाजातला धार्मिक तणाव वाढेल का? सोशल मीडियातल्या सगळ्यांच्या खासगीपणाचं संरक्षण होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले कायदे या तंत्रज्ञानाला पूरक आणि त्याच वेळी नियंत्रणात ठेवू शकतील का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पुढच्या काळात आपल्यापुढे असेल.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १२ जून २०२१ / जयवंत वळकुंजे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 26