राष्ट्रवादी काँग्रेस

  • राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेस

    • 16 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 16 Views
    • 0 Shares
     राष्ट्रवादी काँग्रेस
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भारतातील पक्ष पद्धतीया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    ७.  पक्ष आणि हितसंबंधी गट :
        * राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष - विचारप्रणालीसंघटन, पक्षीय निधी, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधार.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; िवविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    राष्ट्रवादी काँग्रेस
     
    *   राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून २०२१ रोजी २२ वा वर्धापन दिन साजरा झाला. स्थापनेची २२ वर्षं पूर्ण करतांना ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे. २२ वर्षांच्या त्याच्या आयुष्यात हा पक्ष केवळ ५ वर्षं सत्तेबाहेर राहिला आहे. २०२० पासून ’राष्ट्रवादी’नं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं आहे. शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेची चूल मांडून जुनी समीकरणं मोडली आहेत.
     
    *   राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांपासून या पक्षातले अनेकजण यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काही अन्य पक्षांमध्ये होते. सत्ता म्हणजे केवळ राज्य सरकार नव्हे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार संस्था, बाजार समित्या हीसुद्धा सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे आणि त्यांच्या परिवारांकडे त्यांच्या त्यांच्या भागातली ही सत्तास्थानं अनेक वर्षं आहेत. सत्तेत असा आणि एवढा काळ वाटा असणारा काँग्रेसनंतर ’राष्ट्रवादी’ हाच दुसरा पक्ष असावा.
     
    *   १९९९ ते २०१४ पर्यंत ते काँग्रेससोबत सत्तेत होते. २०१४ मध्ये जरी ते सतेतून बाहेर गेले तरीही पूर्ण बहुमत न मिळालेली भाजपा ’राष्ट्रवादी’ने मदत केल्यामुळे शिवसेना येण्याअगोदर सत्तेत राहू शकली. २०१९ मध्ये जे सत्तानाट्य महाराष्ट्रात घडलं, त्यानंतर ’महाविकास आघाडी’ घडवून शिवसेना आणि काँग्रेससारख्या दोन ध्रुवांना एकत्र बांधणारी ’राष्ट्रवादी काँग्रेस’च होती.
     
    *   सत्तेत कायम वाटा असणारा, दिग्गज नेत्यांची रांग असणारा हा पक्ष महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवू शकलेला नाही. भाजपा महाराष्ट्रात एकहाती सत्तेच्या निकट पोहोचला, दोनदा शंभरीपार गेला, पण ’राष्ट्रवादी’ का नाही तिथं पोहोचला? उत्तर प्रदेश मध्ये मायावती-मुलायम यांचे पक्ष, बिहारमध्ये लालूप्रसाद-नितीश कुमार यांचे पक्ष, बंगालमध्ये तृणमूल, तमिळनाडूमध्ये डीएमके वा एआयएडीएमके आणि देशभर इतर राज्यांमध्ये स्थानिक नेतृत्व असलेले वा शरद पवारांसारखं राष्ट्रीय स्तरावर मान्य झालेलं नेतृत्व असणारे अनेक पक्ष त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता मिळवू शकले. पण पवारांची ’राष्ट्रवादी’ ते महाराष्ट्रात का करू शकली नाही?
     
        राष्ट्रवादी मराठा नेतृत्वापुरतीच मर्यादित -
     
    *   राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक निरिक्षण कायम नोंदवलं गेलं ते म्हणजे हा बहुतांशानं मराठा नेतृत्वाचा आणि मतदारांचा पक्ष आहे. ’राष्ट्रवादी’ची निर्मिती ही काँग्रेसमधून झाली आणि काँग्रेसचं ग्रामीण भागातून सहकाराच्या जाळ्यातून उभं राहिलेलं स्थानिक नेतृत्व हे मराठा समाजातून होतं.
     
    *   राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये कायम मराठा समाजाला जास्त संधी दिलेली पहायला मिळते. शरद पवारांचं राजकारण हे नेहमी राजकीय बेरजेचं राहिलेलं असल्यानं अनेक ओबीसी, दलित आणि मुस्लिम समुदायातले नेतेही या पक्षातून वर आलेले पहायला मिळतात. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक ही त्यातली काही नावं. पण ही काही नावं वगळता बाकी नेते बहुतांशानं मराठा समाजातून येतात.
     
        राष्ट्रवादीचा मतदार हा सर्वाधिक मराठाच  -
     
    *   राष्ट्रवादीचा मतदार हाही सर्वाधिक मराठाच आहे असंही कायम म्हटलं गेलं. २०१४ च्या दोन्ही निवडणुका आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक, या तिन्ही निवडणुकीत ’राष्ट्रवादी’च्या जागा कमी झाल्या याचं कारण मराठा मतदार त्यांच्यापासून दुरावला असं म्हटलं गेलं आणि त्याच वेळेस तो प्रामुख्यानं भाजपाकडे गेला त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या असंही दिसलं. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं अधिक मराठा नेतृत्वाला संधी दिली, इतर पक्षांतून अनेक मराठा नेते आपल्या पक्षात घेतले, पण मराठा मतदारांनी पुन्हा ’राष्ट्रवादी’कडे पाऊलं टाकल्यानं त्यांच्या जागा वाढल्या, असं मत काही निरिक्षकांनी नोंदवलं.
     
    *   २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाढलेल्या जागांमागे मराठा मतदारांनी शरद पवारांना दिलेली पसंती हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. गेल्या काही निवडणुकांमध्ये जो मराठा मतदार शिवसेना-भाजपकडे वळला होता तो मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मागे एकवटल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व ग्रामीण भाग तसंच नाशिक आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मराठा मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतं. यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे शरद पवार. भाजपकडून शरद पवारांना लक्ष्य केले गेल्यानं पवारांबद्दल सहानुभूती निर्माण होऊन मराठा मतदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसमागे एकवटले.
     
    *   राष्ट्रवादीने या निवडणुकीत इतर घटकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये यश आल्याचं दिसत आहे. २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसंच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार आणि मराठा मतदार भाजपच्या पाठीशी राहिला आहे.
     
    *   पण मराठा राजकारणावर आपले गड टिकवून ठेवणार्‍या ’राष्ट्रवादी’साठी  ती एक मर्यादा बनली आहे.
     
    *   मराठा समाज महाराष्ट्रातला सर्वाधिक लोकसंख्या आणि मतदार असलेला समाज आहे. ’मराठा’ छबीमुळे ’राष्ट्रवादी’च्या मागे इतर समाजातले मतदार येत नाहीत. सोशल इंजिनिअरिंग करून भाजपा महाराष्ट्र विधानसभेत दोनदा शंभरीपार गेला, पण तसं ने केल्यानं ’राष्ट्रवादी’ राज्यभर पसरूनही स्वबळावर बहुमतापपर्यंत जात नाही.
     
    *   १९९९ पासून आजपर्यंत शरद पवारांचा ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ मराठाकेंद्रीत पक्ष म्हणून गणला जातो. मात्र ’राष्ट्रवादी’चा गड असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मराठवाडा, तिथंही त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना झगडावं लागतं. हे सगळं करतांना पवारांनी त्यांचे शिलेदार तयार केले असतील, तरी त्यात मराठापट्ट्याच्या पलिकडे जाऊन ओबीसी, अल्पसंख्याक आणि दलित या समाजांमध्ये अस्तित्व हे नगण्य राहिलं आहे. त्यामुळेच ’राष्ट्रवादी’ची ओळख ही केवळ मराठ्यांनी, मराठ्यांच्या आणि मराठ्यांपुरता चालवलेला पक्ष अशी झालेली आहे.
     
        राष्ट्रवादी  ग्रामीण महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष -
     
    *   राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागापुरता मर्यादित पक्ष आहे असं सतत या पक्षाबद्दल बोललं गेलं आणि २२ वर्षांनंतरही ती ओळख या पक्षाला बदलता आलेली नाही. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, सोलापूर अशा शहरांमध्ये आणि इतर महानरपालिकांमध्ये या पक्षाने ताकद निर्माण केली. पण तिथंही सत्ता कायम राहिली नाही.
     
    *   ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांवरचं त्यांचं वर्चस्व जास्त राहिलं. परिणामी ’राष्ट्रवादी’चा तोंडावळा ग्रामीणच राहिला. याचा एक परिणाम म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर काही ग्रामीण महाराष्ट्र हाच ’राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला राहिला. तिथं नुकसान झालं तेव्हा पक्ष सत्तेबाहेर गेला आणि या भागातला मतदार मागे उभे राहिला तेव्हा पक्ष सत्तेत आला. असं होण्याचं एक कारण म्हणजे काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीचंही राजकारण सहकार आणि साखरपट्ट्यावरच आधारलेलं आहे. ते राजकारण संस्थानिकांसारखं करणारे ग्रामीण भागातले नेते ’राष्ट्रवादी’मध्ये आहेत.
     
    *   सहकारासोबत या भागात पसरलेल्या शिक्षणसंस्थांचाही आता महत्त्वाचा प्रभाव आहे. परिणामी पक्षाचं नेतृत्व हे ग्रामीण भागातून येतं. त्याबरोबरच आघाडीमध्ये सत्तेत असतांना ग्रामीण भागाशी संबंधित असलेली खाती ’राष्ट्रवादी’कडे होती आणि तुलनेनं शहरी खाती काँग्रेसकडे होती.
     
    *   केंद्रात दहा वर्षं कृषी खातं शरद पवारांकडे होतं. सहाजिकच ग्रामीण भागात पक्ष अधिक वाढला. पण त्यामुळं शहरी, नागरी मतदारांचा पक्ष ’राष्ट्रवादी’ बनू शकला नाही. मुंबईसारख्या महानगरात आणि आर्थिक राजधानीत ’राष्ट्रवादी’चं अस्तित्व नगण्य राहिलं आणि मोठे नेतेही इथून पक्षाला मिळाले नाहीत.
     
    *   राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे मुंबई, पुणे आणि नाशिक या पट्ट्यातल्या शंभरहून अधिक जागांमध्ये त्यांचं फारसं अस्तित्व नाही. ठाण्यात पूर्वी होतं पण आता ते ओसरलं आहे. त्यामुळे इथे मोठा फटका बसतो. विदर्भात, जिथं ६० जागा आहेत, तिथे सुद्धा त्यांना फारसं यश मिळालेलं नाही. जास्तीत जास्त ६-७ जागा तिथं मिळतात. म्हणजे जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात दोन अंकी संख्या गाठतांना त्यांची दमछाक होते. मग उरलेल्या महाराष्ट्रातल्या साधारण १४४ जागांमध्ये त्यांना स्कोअरिंग करावं लागतं.
     
    *   २२ वर्षं झाली तरी पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापलिकडे पक्षाला अजूनही जम बसवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त ७१ पर्यंत मजल मारू शकले आहेत आणि पंचाहत्तरी पार करु शकले नाहीत.
     
    *   जी ’राष्ट्रवादी’ची नेतृत्वाची दुसरी फळी आहे ती याच ग्रामीण भागातून आली आहे. मुंबईत त्यांना नवीन नेतृत्व उभं करता आलं नाही. सचिन अहिरांना त्यांनी खूप बळ दिलं पण त्याचा उपयोग झाला नाही. नंतर तेही शिवसेनेत निघून गेले. एक नवाब मलिक सोडले ते दुसरं नाव घेता येईल असा नेता मुंबईत त्यांच्याकडे नाही.
     
        शरद पवार यांच्याभोवती पक्ष केंद्रीत -
     
    *   २२ वर्षांपासून त्यांनी स्थापना केल्यानंतर ’राष्ट्रवादी काँग्रेस’च्या केंद्रस्थानी शरद पवार हेच पूर्णपणे आहेत. पक्ष त्यांच्यावरच अवलंबून आहे. त्याची चुणूक २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. बहुतांश नेते गलितगात्र झालेले असतांना आणि अनेकजण पवारांची साथ सोडून भाजपात जात असतांना शरद पवारांनी एकहाती निवडणूक लढवली. त्यावेळच्या भाजपा-शिवसेना युतीसमोर ते एकटे उभे राहिले. परिणामी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि भाजपाला बहुमतापासून रोखण्यात त्यांना यश आलं. इतकेच नव्हे तर पवारांनी पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही महाआघाडी प्रत्यक्षात आणून दाखवून भाजपाला सर्वांत मोठा पक्ष असूनही विरोधात बसण्यास भाग पाडलं.
     
    *   शरद पवारांचा शब्द आणि निर्णय हाच पक्षात अंतिम आहे. अजित पवारांचं बंड त्यांनी ज्या प्रकारे मोडून काढलं आणि फुटलेला पक्ष काही तासांमध्ये परत जोडला तेही हेच दाखवतं. ’महाआघाडी’चं सरकार स्थापन झाल्यावरही कोरोना संकट असो वा चक्रीवादळ, शरद पवार इतर कोणत्याही मंत्र्यासारखे कार्यरत आहेत.
     
    *   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी फळी - अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे अशी मोठी नावं या फळीत आहेत. तरीही शरद पवारांच्याच प्रतिमेभोवती हा पक्ष फिरतो आहे.
     
    *   महाराष्ट्रभर अपिल असणारा नेते म्हणजे, शरद पवारांनंतर थोडाफार, ते म्हणजे अजित पवार. छगन भुजबळांचं एकेकाळी खूप अपिल होतं. विशेषत: ओबीसींचा मोठा नेता म्हणून ते पुढे आले. पण त्याचं मतांमध्ये रुपांतर झालं नाही किंवा तसा फायदा करून घेता आला नाही. जयंत पाटील, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील हे सगळे त्यांच्या भागापुरते प्रभावी नेते आहेत.
     
    *   ’राष्ट्रवादी’ची स्थापना जेव्हा झाली तेव्हा काँग्रेसमधून जी नेतेमंडळी त्यांच्याकडे आली, त्यापेक्षा वेगळं नेतृत्व त्यांना उभं करता आलं नाही. आता त्यांनी अमोल कोल्हे, अमोल मिटकरी असे चेहरे समोर आणले आहेत.
     
    *   मध्यंतरीच्या काळात ’युवती मंच’च्या नावानं सुप्रिया सुळेंना पुढं केलं गेलं. एक पॅन-महाराष्ट्र इमेज तयार करायची होती. पण तेही पुढे बारगळलं. त्याच वेळेस रोहित पवार, पार्थ पवारांच्या नावानं नवीन पिढी पक्षात येते आहे. ’राष्ट्रवादी काँग्रेस’ खर्‍या अर्थानं नव्या वळणावर आहे.
     
    *   एवढी भक्कम दुसरी फळी असतानाही ’राष्ट्रवादी’ राज्य काबीज करू शकलेली नाही. सत्तेत राहणं हेच ध्येय बनविल्यामुळे पक्षाची वाढ खुंटल्याचे मानले जाते. त्यासाठी काँग्रेससारख्या मित्राबरोबर सतत सत्तावाटप करावं लागलं. ते केल्यानं काही भागांमध्ये वाढ होऊच शकली नाही. या सत्तावाटपात ’राष्ट्रवादी’नं मुख्यमंत्रिपद कायम सोडलं आणि त्याबदल्यात अधिक मंत्रिपदं घेतली.
     
    सौजन्य व आभार : बीबीसी मराठी
    १० जून २०२१

Share this story

Total Shares : 0 Total Views : 16