ब्रिज कोर्स
- 12 Jun 2021
- Posted By : study circle
- 59 Views
- 1 Shares
ब्रिज कोर्स
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”शिक्षण” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात ”शालेय विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स” व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (3) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
1.2 शिक्षण :
मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार. भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण) शिक्षण प्रणाली (शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी) समस्या आणि प्रश्न. शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स
* 2021-22 शैक्षणिक सत्रात ऑफलाइन शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना एक नवीन ब्रिज कोर्स शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने हा ब्रिज कोर्स तयार केला. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे.
* शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून राज्यातील शाळा बंद आहेत. दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. त्यात कोरोनासारखा साथीचा जीवघेणा आजार त्यांनी पाहिला किंवा अनुभवला आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे.
* या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम ठरवणार असल्याचं एससीईआरटी ने स्पष्ट केलं. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.
ब्रिज कोर्सचे स्वरुप -
* 15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय ब्रिज कोर्समध्ये आहेत
1) प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा आहे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार.
2) हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा आहे.
3) यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
4) पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
5) ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवला जाणार.
6) ब्रिज कोर्सकडे केवळ एक कोर्स पूर्ण करण्याच्यादृष्टीने पाहण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रात्यक्षिक, त्यांचे अनुभव याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा.
7) सुरुवातीला विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर काय आहे याची चाचपणी शिक्षक करतील, ब्रिज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही हे शिक्षकांना पहावे लागणार.
8) ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी आहे.
9) मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रिज कोर्स आहे. प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळांकडून ब्रिज कोर्स अंतिम केला जाणार.
10) मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोसर् आहे. शाळा बंद असल्याने दुसरीत गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात पहिलीत शाळेत न जाता दुसरीत गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे असं गृहीत धरुन ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित. पुढील इयत्तेत शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी पूर्वज्ञानावर अवलंबून असतात. त्या मुलांना आल्या पाहिजेत हा हेतू आहे.
ब्रिज कोर्सची आवश्यकता-
1) 2020 वर्षीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित शिक्षण पोहचलेलं नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाचीही सोय नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपेक्षित व पुरेसे आकलन झालेले नाही.
2) विद्यार्थ्यांचे जवळपास 2 वर्षांचे शैक्षणिक नुकसान झाले असून शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यास शाळांनी सुरू करू नये अशी काही शिक्षकांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर हा ब्रिज कोर्स तयार करण्यात आला आहे.
3) ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलेलं नाही. उदा. तिसरीत विद्यार्थ्यांची गुणाकाराची संकल्पना स्पष्ट झाली नाही तर चौथीत भागाकार करण्यात त्यांना अडचणी येणार. एकूणच विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहणार. हे केवळ एका विषयाच्या बाबतीत नाही तर प्रत्येक विषयाची ही परिस्थिती असू शकते.
4) शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढणं गरजेचं आहे. यासाठी ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे.
’लर्निंग लॉस’ म्हणजे नेमके काय?
1) ब्रिज कोर्समध्ये केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर भर देण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, त्यांचे समुपदेशन अशा गोष्टींचीही दखल घेण्यात यावी असं अनेक शिक्षकांना वाटते.
2) लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतीदुर्गम भागात राहणार्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले.
3) लॉकडॉऊनसारख्या स्थितीत विद्यार्थ्यांचा दोन प्रकारचा लर्निंग लॉस होत असतो. पहिला म्हणजे यापूर्वी जे मुलांना येत होतं त्यातूनही मुलं थोडी मागे गेल्याचे दिसते. दुसरं म्हणजे यावर्षी जे शिकले असते तेवढे शिक्षणही त्यांच्यापर्यंत पोहचलेले नाही.
सौजन्य व आभार : बीबीसी मराठी
10 जून 2021