व्यसनाधीनता व दारूबंदी

  • व्यसनाधीनता व दारूबंदी

    व्यसनाधीनता व दारूबंदी

    • 02 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 182 Views
    • 0 Shares
     व्यसनाधीनता व दारूबंदी  
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’व्यसनाधीनता व युवकांच्या समस्या’  या मुद्द्यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’ चंद्रपुरातील दारुबंदीला बंदी ’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
     
    २.१ जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर १९४८) :
        सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथालोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज
     
    २.४ युवकांचा विकास  :
        समस्या व प्रश्‍न (अंमलीपदार्थाचे व्यसन), शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चंद्रपुरातील दारुबंदीला बंदी
     
    *   महात्मा गांधी म्हणायचे, ‘जर मला एक दिवस या देशाचा हुकूमशहा बनवलं तर मी सर्वात प्रथम जर कोणते काम करेन, तर ते देशातील सर्व दारूची दुकाने बंद करेन.’ स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांना जोडणार्‍या महात्मा गांधींनी महिलांच्या जीवाभावाच्या विविध प्रश्नांवर आंदोलन उभे करून हे साध्य केले होते. महात्मा फुले म्हणत, थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा। तोच खर्च करा ग्रंथापायी॥’. ब्रिटिश काळातील प्रश्न आजदेखील महिलांना भेडसावत आहेत आणि आपल्या स्वतंत्र देशातील सरकारांकडे त्यावर कोणतीही उपाययोजना व धोरण नाही.
     
    *   २०२१ च्या मे महिन्यात चंद्रपूरची दारूबंदी राज्य सरकारने उठवली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारूत वाढ होणे, तरुण वर्ग अमली पदार्थांच्या आहारी जाणे, गुन्हेगारीत वाढ होणे अशा कारणांमुळे ही दारूबंदी मागे घेतली; पण दारूबंदी मागे घेणे, म्हणजे ऐन कोरोनाकाळात सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणे, त्यांचे नीतीधैर्य खचवणे आहे. दारूबंदी यशस्वी होण्याकरिता सर्व बाजूंनी प्रयत्न करावे लागतील. प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार, उपचार व पुनर्वसन या पंचसूत्रीनुसार काम करावे लागेल.
     
        दशकभराची वाटचाल -
     
    *   याआधीच महाराष्ट्रात वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांत दारूबंदी लागू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २०१० ते २०१२ या काळात दारूबंदी आंदोलनाचा उठाव झाला. त्याला पारोमिता गोस्वामी यांच्यासारख्या संवेदनशील महिलेचे नेतृत्व लाभले. महिलांनी ३५० कि. मी.ची पायी दिंडी काढत नागपूर विधानभवनावर मोर्चा नेला. या आंदोलनाने व्यापक व आक्रमक रूप धारण केले. ५८८ ग्रामपंचायतींनी दारूबंदीच्या मागणीचे ठराव पारित केले. या मागणीच्या पूर्ततेसाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयाने संजय देवताळे यांची समिती स्थापन केली गेली. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात फेब्रुवारी २०१२ मध्ये या समितीने अहवाल दिला. राज्यात दरम्यान सत्ताबदल होऊन भाजप-शिवसेनेचे युती सरकार आले. त्यांनी महिलांची मागणी मान्य करत १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंदी लागू झाल्याची घोषणा केली. याविरोधात याचिका दाखल करणार्‍या दारू दुकानदारांच्या संघटनेची भूमिका सुप्रीम कोर्टाने अमान्य केली.
     
    *   २०१९ मध्ये ‘मविआ’ सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार पालकमंत्री झाले. त्यांनी दारूबंदी उठवण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी खेमनार समिती स्थापन केली. या समितीने मार्च २०२० मध्ये आपला अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. ऐन करोना-काळात, ऑक्टोबर २०२० मध्ये राज्य सरकारने १३ सदस्यांची ‘रमानाथ झा समिती’ गठित केली व घाईगडबडीने करोनाकाळातील या समितीच्या अहवालावर विचार करून दारूबंदी उठवली गेली आहे. पालकमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “या समितीकडे ‘दारूबंदी कायम ठेवा’ अशा मागणीच्या निवेदनांपेक्षा ‘दारूबंदी उठवा’ अशी निवेदने जास्त प्राप्त झाली.”  महिला चळवळीकडे एवढया निवेदनांच्या संख्येची ताकद असती तर महाराष्ट्राचे चित्र नक्कीच वेगळे असते. पण निवेदनांच्या संख्येवर आधारित निष्कर्ष काढायचा होता तर समिती नेमण्याची तरी काय गरज होतीहे कोणी सामान्य अधिकार्‍यानेदेखील केले असते.
     
        ‘अवैध’ युक्तिवाद -
     
    *   दारूबंदी उठवण्यामागची जी कारणे पालकमंत्री पुढे करत आहेत, ती कारणे निराधार आहेत. जिथे सरकारमान्य दारू सुरू आहे तिथे अंमली पदार्थाचे सेवन होत नाही काय? अवैध दारूबद्दलही तेच  आहे. चंद्रपूरमधील काय किंवा महाराष्ट्रातील काय, अवैध दारू रोखणे हे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे व पर्यायाने सरकारचे काम आहे. जिथे सरकारमान्य दारू सुरू आहे तिथेदेखील तितक्याच प्रमाणात, किंबहुना जास्त प्रमाणात अवैध दारू उपलब्ध आहे. देशभरात एकूण उपलब्ध दारूपैकी ३० टक्के दारू ही अवैध आहे. त्यामुळे लोकांनी अवैध दारू पिऊ नये म्हणून सरकारमान्य दारू चालू करणे म्हणजे जखमेपेक्षा इलाज भयंकर होय. मुंबईमधील मालवणी येथे २०१५ मध्ये अवैध दारू पिऊन ५३ लोक मृत्युमुखी पडले. तेव्हा मुंबईतही दारूबंदी नव्हती. याचा अर्थ सरकारमान्य दारू सुरू केल्यामुळे अवैध दारू थांबते, हा तर्क चुकीचा आहे. दुसरा तर्क म्हणजे दारूबंदी लागू असल्यास गुन्हेगारीत वाढ होते. याउलट, गावागावात असणारी दारूची दुकाने ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगारीचे व गुन्हेगारांचे केंद्रच असते. बहुतांश गुन्हे हे दारू पिऊनच तडीस नेल्याचे पाहायला मिळते. अवैध दारू काय किंवा सरकारमान्य दारू काय, दोन्ही प्रकारच्या दारूने महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ होते हे उघड सत्य आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार, करोनाकाळात घरगुती हिंसाचाराच्या घटनांत अडीच पट वाढ झाली आहे. एकूणात घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांत ८६ टक्के महिलांना मदतच मिळत नाही व ७७ टक्के महिला घरगुती हिंसाचाराची माहिती समाजासमोर, पोलिसांसमोर देत नाहीत.
     
        कायद्यात बदल हवा -
     
    *   महाराष्ट्रात दारूबंदी अधिनियम १९४९ लागू आहे. यात दोन-तीन वेळा छोटया-मोठया सुधारणा झाल्या आहेत. खरे तर त्यामध्ये सुधारणा करून जनतेला दारूबंदीच्या प्रक्रियेत सकारात्मकरीत्या सामील करून घेऊन सरकारने एक अभियान सुरू करणे गरजेचे आहे. त्याऐवजी पोलिसांचा, उत्पादन शुल्क विभागाचा भ्रष्टपणा मान्य करणे व त्याला प्रोत्साहन देणे म्हणजेच दारूबंदी उठवणे होय. शेजारच्या आंध्र व तेलंगणा या राज्यांतून पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने डोळेझाक केल्याशिवाय चंद्रपुरात दारू येईलच कशी? गावातले दारूचे दुकान हे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे किंवा त्याला आर्थिक पुरवठा करणार्‍या भांडवलदाराचे असते. ते बंद करण्यासाठी जिथे इतर राजकीय पक्ष महिलांच्या चळवळीला पाठिंबा देतात, तिथे ते बंद होते.
     
    *   कोल्हापूरमध्ये ५० पेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही गेल्या आठ-दहा वर्षांत कायद्यामध्ये असलेल्या महिलांच्या मतदानाच्या तरतुदीचा उपयोग करत दारूबंदी केली आहे. गावातील एकूण महिलांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केल्याने दारूबंदी घोषित होते. परंतु दारूबंदी उठवताना साध्या पाच- पन्नास लोकांच्या ग्रामसभेचे पत्रदेखील पुरेसे ठरते. त्यामुळे या कायद्यात बदल होणे आवश्यक आहे.
     
    *   आणखी एक मुद्दा म्हणजे महसुलाचा! २०१८-१९ मध्ये राज्य सरकारला २५ हजार ३२३ कोटी रुपयांचा महसूल दारूतून प्राप्त झाला. म्हणजे दिवसेंदिवस लोकांच्या गळी जास्तीत जास्त दारू उतरवली जात आहे. पण याच दारूमुळे २५ हजार कोटींपेक्षा (सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांत) जास्त रक्कम आरोग्यावर- म्हणजेच दारूतून निर्माण झालेल्या आजारांवर खर्ची पडते, याचे गणित कोण मांडणार? अनेक गुन्ह्यंमध्ये, अपघातांमध्ये दारूमुळे जाणार्‍या निरपराध जीवांची किंमत कशी काय करणार?
     
    *   देशातील काय किंवा महाराष्ट्रातील काय, जनतेचा सांस्कृतिक कल हा दारूबंदीविरोधीच आहे. हिंदू धर्मातील अनेक पंथ/ समुदाय यांचा दारूला विरोध आहे. गौतम बुद्धांनी दारूला विरोध केला आहे. इस्लाममधील कुराणानुसार, दारू हराम आहे. जैन व लिंगायत धर्माचाही दारूला विरोध आहे. भारतातील ४९ टक्के महिलांची लोकसंख्या ही कथित उच्चवर्गीय महिलांचा अपवाद वगळता दारू सेवन करत नाही. त्यामुळे चंद्रपुरातील जनतेची दारूबंदीची मागणी ही न्याय्यच आहे. दारूबंदी अंमलबजावणीचा एखादा पॅटर्न अपयशी ठरत असेल तर त्याला पर्यायी पॅटर्न उभा करून तो राबवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
     
    *   भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४७ नुसार भारतीय नागरिकांचे आरोग्य सांभाळणे हे सरकारचे कर्तव्य आहे. राज्यघटनेतील तत्त्वांचा आदर सरकारने केला पाहिजे.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक लोकसत्ता, पुढारी

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 182