'तौक्ते' चक्रीवादळ

  •  'तौक्ते' चक्रीवादळ

    'तौक्ते' चक्रीवादळ

    • 19 May 2021
    • Posted By : study circle
    • 5865 Views
    • 6 Shares
    ‘तौक्ते’ चक्रीवादळ
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’नैसर्गिक आपत्ती व चक्रीवादळ’ या विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नैसर्गिक आपत्ती व चक्रीवादळा शी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, उपयोजित माहिती, मुद्दे, घटक, प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : २.२ हवामानशास्त्र -
     
    *   वातावरण - संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे. सौरऊर्जा - पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान - पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे उर्ध्व व क्षितीज समांतर वितरण.
     
    सामान्य अध्ययन पेपर (४) : अर्थव्यवस्था, कृषि, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
     
        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : ३.६ आपत्ती व्यवस्थापन -
    *   नैसर्गिक आपत्ती - व्याख्या, पर्यावरणीय तणाव (स्ट्रेस), आपत्तीचे वर्गीकरण.
    *   आपत्तींची ओळख / पूर्वकल्पना व वितरण, प्रभावक्षेत्र व धोके त्यांचे विश्‍लेषण, आपत्ती विषयक जाणीवा, पूर्वानुमान, मदत कार्य व पुनर्वसन कार्य.
     
    *   (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.) 
     

    ‘तौक्ते’ चक्रीवादळ
     
         २०२१ च्या मे महिन्यामध्ये सलग दुसर्‍या वर्षी कोकणाला मान्सूनआधीच चक्रीवादळाचा तडाखा बसला. २०२० मध्ये निसर्ग आणि २०२१ मध्ये तौक्ते या दोन्ही वादळांचा प्रभाव किनार्‍यापासून दूरवरच्या भागातही दिसून आला. अरबी समुद्रात पूर्वमोसमी काळात २०१८ पासून सलग चौथ्या वर्षी २०२१ च्या मे महिन्यात चक्रीवादळाची निर्मिती झाली. हवामानाचा आढावा घेण्यासाठी १९८० पासून भारतात उपग्रहाचा वापर सुरू झाला होता आणि उपग्रहाद्वारे नोंदी ठेवण्याचा कालखंड सुरू झाल्यापासून पूर्वमोसमी काळात सलग ४ वर्षे चक्रीवादळाची निर्मिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

        घटनाक्रम -

     

    *   १४ ते १५ मे २०२१ च्या दरम्यान लक्षद्वीप बेटाजवळ दक्षिणपूर्व अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाले. सरड्याची प्रजाती असलेल्या हायली व्होकल लिझार्ड (गेच्को) अर्थात बोलका सरड्याच्या नावावरून म्यानमारने हे नाव दिले. म्यानमार देशात तौक्ते नावाचा सरडा सुरेल आवाज काढतो. तौत्केचा उच्चार तौते असाही करतात. 
     
    *   १४ मे  - लक्षद्वीप बेटांचा भाग आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले. सुरुवातीला ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणार्‍या वादळाचा  वेग ८० किमी पर्यंत गेला. हा वेग समुद्रामध्ये काहीवेळा ताशी १६० ते १७५ कि. मी. इतका होता.  हे चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर गेले. या काळात केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्स्थान, तामिळनाडूसह काही राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. 
     
    *   १५ मे - केरळच्या किनारपट्टी भागात तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. केंद्रीय जल आयोगाने  तामिळनाडू आणि केरळ राज्यांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला होता. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली. किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले.  मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले होते. या ५ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.कासरगोड जिल्ह्यात वार्‍याच्या वेगानं दुमजली इमारत कोसळले. किनार्‍यावर येऊन आदळणार्‍या लाटांचा तडाखा तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला बसला. वलियाथुरा येथील ६० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचं नुकसान झालं. 
     

     
    *   १६ मे - गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रातील चक्रीवादळाचें रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले. तौक्ते वादळाने ’व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केली. 
     

     

    *   १६ मे - तौक्ते चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या ५ तालुक्यांच्या किनारी भागास फटका बसला.
     
    *  १६ ते १७ मे  - कोकणच्या किनारपट्टीवर मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडला.  कुलाबा वेधशाळेने या काळासाठी राज्यातील ५ जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट तर १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला. 

     

     

    *   १६ ते १७ मे -  हे वादळ दक्षिण कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात धडकले. महाराष्ट्रातील किनारपट्टी भागाचे नुकसान झाले. 

     

     

     
    *   १८ मे - गुजरातला धडकले. या वेळी वार्‍याचा वेग ताशी १५० ते १६० किमी. होता.

     

     

    अरबी समुद्रातील चक्रीवादळे

     

         वादळांमुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ स्टॉर्म सर्ज (सागरी उधाण) म्हणून ओळखली जाते. नेहमीच्या भरतीपेक्षा स्टॉर्म सर्जच्या वेळी मोठ्या लाटा उसळतात आणि त्यामुळे समुद्राचं पाणी चढतं. याचा परिणाम म्हणून किनारपट्टीच्या भागात मोठे पूर येतात.
     
    मुंबई व अरबी समुद्रातील स्टॉर्म सर्ज
     
    *   जपानमधले संशोधक एच. मुराकामी, एम. सुगी आणि ए. किटोह यांनी २०१२ सालच्या शोधनिबंधात म्हटले आहे, की अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता ४६ टक्के इतकी वाढेल, तर बंगालच्या उपसागरमध्ये ही वारंवारिता ३१ टक्क्यांनी कमी होईल. त्यांचा शोधनिबंध ’फ्युचर चेंज इन ट्रॉपिकल सायक्लॉन इन द नॉर्थ इंडियन ओशन प्रोजेक्टेड बाय हाय-रेझोल्युशन एमआरआय-एजीसीएम’ या नावाने ओळखला जातो. त्यात त्यानी अरबी समुद्रात चक्रीवादळे वाढण्यामागची कारणमीमांसा केली. त्यासाठी विविध थर्मोडायनॅमिक मानकांचा अभ्यास करण्यात आला.  

     
        जपानी संशोधकांच्या शोधनिबंधातील मुंबईबाबतच्या नोंदी -

     

    १)  १९७९ ते १९९१ या कालावधीशी तुलना करता १९९२ ते २००८ या कालावधीत अरबी समुद्रात दरवर्षीच्या वादळांच्या दिवसांत वाढ झाली आहे.
    २)  चक्रीवादळांमुळे होणारे स्टॉर्म सर्ज म्हणजेच वादळामुळे आलेलं सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी १.८ मीटर इतकी वाढेल.
    ३)  ब्राऊन क्लाऊडमुळे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व चक्रीवादळांची तीव्रता वाढली आहे. ब्राऊन क्लाउड म्हणजे हवेतील प्रदूषणाचा थर होय. परिणामी वाढत्या जागतिक तापमानामुळे चक्रीवादळांची तीव्रता वाढेल.
    ४)  अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता ४६ टक्केंनी इतकी वाढेल.
    ५)  बंगालच्या उपसागरमध्ये ही वारंवारिता ३१ टक्केंनी कमी होईल.  
     
        मुंबईतील उधाणाची स्थिती -
     
    *   सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी १.८ मीटर इतकी वाढेल, असा संशोधकांचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर कमी तीव्रतेचं चक्रीवादळही शहरात आणि कोकण किनारपट्टीवर मोठं नुकसान करू शकतं.
     
    १)  २०१४ मध्ये खरगपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) संशोधक सी. शाजी आणि टी. विशाल, तसंच आय. एम. सिस्टीम्स ग्रुप (मेरीलँड, अमेरिका) येथील संशोधक एस. कार यांनी ’स्टॉर्म सर्ज स्टडीज इन द नॉर्थ इंडियन ओशिएन : ए रिव्ह्यू’ हा रिसर्च पेपर लिहिला. त्यामध्ये मुंबईतील स्टॉर्म सर्ज ही १.५ मीटर इतकी असल्याची नोंद आहे.
     
    २)  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे वरिष्ठ संशोधक आर. मणीमुरली यांच्या मते, जागतिक तापमान वाढीमुळं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यांच्या मते, तापमान वाढीमुळे या शतकात समुद्राच्या पातळीत होत असलेली वाढ मुंबईत ३० सेंमी असेल.
     
    ३)  स्टॉर्म सर्जमुळे होणारी वाढ १.५ सेंमी आणि तापमान वाढीमुळे होणारी वाढ ३ सेंमी धरली तर या शतकाभरातील समुद्राच्या पातळीतील वाढीचा प्रभाव १.८ मीटर असेल.
     
    ४)  २०१३ मध्ये वर्ल्ड बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये कोलकता आणि मुंबई ही शहरं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, चक्रीवादळं, नद्यांना येणारे पूर यांसाठी फारच असुरक्षित असल्याचं म्हटलं होतं.
     
    ५)  जागतिक तापमान वाढ ४ डिग्री सेल्सियस झाली तर २०९० पर्यंत दक्षिण आशियातील समुद्राच्या पाण्याची पातळी १०० सेमीनं वाढेल. 
     
        अरबी समुद्रात वाढती चक्रीवादळे -
     
    *   उत्तर हिंदी महासागर क्षेत्राचा विचार केला, तर उन्हाळ्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात पहिल्यांदा चक्रीवादळे तयार होताना दिसतात. पण २०२१ मध्ये तौक्तेच्या रूपाने मोसमातले पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले. २०१९ पासून अरबी समुद्रात उठणार्‍या चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढत आहे.
     
    १)  भारतीय उपखंडाचा विचार केला, तर बंगालचा उपसागर अनेक ठिकाणी उथळ आहे. बंगालच्या उपसागरात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असतं. तो गरम समुद्र आहे. त्यामुळे तिथे अतिशय शक्तिशाली चक्रीवादळे येतात.
     
    २)  अरबी सुमद्र तुलनेने खोल असून, त्यातले पाणी तुलनेने थंड आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात कमी चक्रीवादळे जन्माला येतात आणि त्यांची तीव्रता कमी असते, पण गेल्या ३-४ वर्षांत हे चित्र बदलेले दिसले आहे. 

     
    *   गेल्या ३ वर्षांत अरबी समुद्रात तयार झालेले तौक्ते हे ११ वे चक्रीवादळ होते. तसेच ते गेल्या ३ वर्षांत अरबी समुद्रात तयार झालेले दुसरे अत्यंत तीव्र चक्रीवादळ (सिव्हिअर सायक्लॉनिक स्टोर्म) होते.

     

     
    १)  २०१८ साली सागर, मेकानू, लुबान ही तीन चक्रीवादळे अरबी समुद्रात तयार झाली होती. पण तिन्ही वादळे पश्‍चिमेला येमेन आणि ओमानच्या दिशेनं वळली होती.
     
    २)  २०१९ साली अरबी समुद्रात एकाच मोसमात इथे वायू, हिक्का, क्यार, माहा, पवन या पाच चक्रीवादळांची नोंद झाली. त्यातली दोन चक्रीवादळं, म्हणजे वायू आणि माहा उत्तरेला म्हणजे गुजरात-पाकिस्तानच्या प्रदेशात सरकली होती.
     
    ३)  २०२० साली जूनच्या सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन-दिवेआगरच्या किनार्‍यावर येऊन थडकलं. तर नोव्हेंबरमध्ये गती हे चक्रीवादळ सोमालियाला जाऊन धडकलं.
     
    ४)  २०२१ साली मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळ लक्षद्वीप ते गुजरात या दिशेने गेले.
     

    *   २००७ मध्ये चक्रीवादळ गोणूचा ओमानला मोठा तडाखा बसला होता. त्यावेळी गोणू या भागातील क्रमांक ५ च्या तीव्रतेचे पहिले चक्रीवादळ होतं. या वादळाचा ओमानला मोठा तडाखा बसला होता.
     

     

        अरबी समुद्र का खवळला आहे?

     

    *   अरबी समुद्रातल्या या वाढत्या चक्रीवादळांनी जगाचंही लक्ष वेधून घेतले आहे. तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे, आणि त्यामुळेच तिथे चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढते आहे.
     
    १)  २०१९ साली भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. १९८१-२०१० च्या तुलनेत गेल्या २०१९ साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ०.३६ अंश सेल्सियसने वाढल्याचे हा अहवाल सांगतो.
     
    २)  चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी एरवी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सियस एवढे असावे लागते. निसर्ग चक्रीवादळ आलं, तेव्हा अरबी समुद्रात हे तापमान ३२ अंशांपर्यंत गेलं होतं, असं हवामान विभागाचे रेकॉर्ड्स सांगतात.
     
    ३)  हवामान बदलांमुळे जगभरातच वादळांची संख्या आणि स्वरुप बदलत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
     
    ४)  चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जास्त असावे लागते. पण जागतिक तापमानवाढीमुळे संपूर्ण समुद्राचे तापमानच वाढत आहे. तसेच काही ठिकाणी वितळेल्या हिमनद्या समुद्रात मिसळत असल्याने पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळांची संख्या कमी होऊ शकते, असे काही शास्त्रज्ञांना वाटते.
     
    ५)  एकीकडे अरबी समुद्राचे तापमान वाढत असताना, बंगालच्या उपसागरात पृष्ठभागावरचं तापमान कमी होऊ शकते. त्यामुळेच बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात वादळांची तीव्रता वाढू शकते. 

     
        मुंबई आणि कोकणाला धोका वाढला?

     

     
    *   अरबी समुद्रात चक्रीवादळ आलं तरी ते थेट मुंबईवर येऊन धडकण्याची शक्यता फार कमी असते.
     
    १)  उत्तर गोलार्धातले विषुववृत्तीय वारे पूर्वेकडून पश्‍चिमेकडे, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडे वाहतात. त्यामुळे आलेले चक्रीवादळ पुढे सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळते. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळे मुंबईपासून अनेकदा दूर जातात.
     
    २)  पृथ्वीवरच्या कुठल्याही समुद्रातील वादळांचा विचार केला, तर साधारण हेच चित्र दिसते. पण अरबी समुद्रातले वादळ मुंबईवर थेट आदळले नाही, तरी मुंबईत आणि कोकणात मोठे नुकसान करू शकते, हे २००९ साली फयान आणि २०२१ च्या तौक्ते या चक्रीवादळांनी दाखवून दिले आहे. २००९ साली कोकणात फयान नावाचे चक्रीवादळ आदळले होते. 
     
    १)  चक्रीवादळाची निर्मिती
    २)  चक्रीवादळांचे प्रकार
    ३)  चक्रीवादळांचे नामकरण
    ४)  चक्रीवादळामुळे होणारा विनाश
    ५)  आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज
    ६)  भारतीय उपखंडातील चक्रीवादळे 
     

    (१) चक्रीवादळाची निर्मिती

     

     
    *   जगभरातील नागरिकांना गेल्या काही वर्षापासून महापूर, अतिउष्ण लाटा, वादळ, चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. मागील २५-३० वर्षात जगात सर्वात जास्त विध्वंस हा समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला आहे. प्रत्येक वेळी कोणतेतरी नवीन नावाचे वादळ येते आणि वित्त व जीवितहानी करते. चक्रीवादळ हे नाव विध्वंसाचा पर्यायी शब्द म्हणून ठरू शकते इतके नुकसान यामुळे होते.
     
    *   वारे बदलले की एक अख्खा ऋतू बदलतो. निसर्गचक्र पुढे सरकते. नवे वातावरण, शेती, जंगल, प्राण्यांवर त्याचे होणारे परिणाम सारे सारे बदलते. वारे कधी कधी विध्वंसक होतात. अशाच विध्वंसक वादळांना चक्रीवादळे असं म्हणतात.
     
    *   एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वार्‍यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते.
     

    १)  सायक्लोन (चक्रीवादळ)या शब्दाची निर्मिती सायक्लोस या ग्रीक भाषेतील शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ सापाचे वेटोळे असा होतो.

     

    २)  बंगालची खाडी व अरबी समुद्रामध्ये या वादळांचे सापाच्या वेटोळ्यासारखे चित्र दिसल्यामुळे हेन्री पेडिंगटन यांनी या वादळांना सायक्लोन असे नाव दिले. तेथून पुढे या चक्रीवादळांना ‘सायक्लोन’ असे संबोधले जाऊ लागले. 

     
        चक्रीवादळाची निर्मिती दोन गोष्टींवर अवलंबून असते  -

     

     
    १)  समुद्राच्या पाण्याचं विशेषतः पृष्ठभागाचं तापमान - पाण्याच्या वरच्या भागाचं तापमान वाढलं, की त्याची वाफ होऊन ती वर सरकते. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो
    २)  वार्‍यांची दिशा - तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या दिशेने आसपासच्या वातावरणातली थंड हवा चक्राकार वाहू लागते. 

     
        चक्रीवादळांचे निर्मिती विज्ञान -
     

     

    *   पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. त्याच्या उत्तरेला २३.५ अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला असणार्‍या या भागाला उष्णकटीबंधीय प्रदेश म्हणतात. म्हणजेच ट्रॉपिकल रीजन. इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं.  पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते. ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो. हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते. ही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे वेगाने वाहू लागतात. हळुहळू या वार्‍यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं. 

     

    १)  सागरावर न्यून दाब क्षेत्र बर्‍याच वेळा आढळते. सागराचे तापमान जास्त असल्यास वातावरणाच्या खालच्या भागास सागरापासून उष्णता व बाष्प प्राप्त होते. बाष्पाच्या संद्रवणामुळे (पाण्यात रूपांतर झाल्यामुळे) वातावरणास संद्रवणाची सुप्त उष्णताही प्राप्त होते. 

     

     
    २)  अशा रीतीने न्यून दाब क्षेत्रावर वातावरणाचा खालचा भाग तापतो. अशा वेळी न्यून दाब क्षेत्रावर वरच्या पातळीत एखाद्या दाब प्रणालीमुळे अपसारण (हवा केंद्रापासून दूरवर नेली जाण्याची क्रिया) निर्माण झाले, तर हवा खालच्या पातळीवरून वर जाण्यास सुरुवात होते. त्यामुळे खालच्या भागात हवा आसपासच्या प्रदेशावरून न्यून दाब क्षेत्रात येते आणि अभिसरणाचे प्रमाण वाढून न्यून दाब क्षेत्राची तीव्रता वाढते. अशा रीतीने न्यून दाब क्षेत्राचे न्यूनतर दाब क्षेत्रात रूपांतर होते. अशा वेळी न्यूनतर दाब क्षेत्राशी संबंधित असलेल्या वार्‍याची गती वाढून १७ ते ३३नॉटच्या दरम्यान होते.
     
    ३)  ह्याच पद्धतीने न्यूनतर दाबाची तीव्रता वाढून त्यांचे चक्री वादळात रूपांतर होते. काही चक्री वादळांची तीव्रता त्यांचे रूपांतर तीव्र चक्री वादळात होते पण अशा चक्री वादळांचे प्रमाण बरेच कमी आहे.
     
    ४)  एखादी विशिष्ट वातावरणीय परिस्थिती असली किंवा निर्माण झाली म्हणजे अतितीव्र वादळाची निर्मिती होते. ही अनुकूल परिस्थिती जुळून येण्यास नक्की कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हे अद्याप समजू शकले नाही.
     
    ५)  फारच थोड्या प्रमाणात तीव्र चक्री वादळांचे रूपांतर अतितीव्र चक्री वादळात म्हणजे हरिकेन, टायफून, सायक्लोन किंवा विलीविलीमध्ये होते.  

     
        चक्रीवादळांची निर्मिती कशी होते?

     

     
    १)  समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणार्‍या वार्‍यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे.
     
    २)  समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सि अंश तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते.
     
    ३)  बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती जास्त असल्या कारणाने तिथे चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे एक प्रकारे
     
    ४)  वाढत असलेले जागतिक तापमान वादळांना वाढण्यास हातभार लावत आहे.
     
    ५)  जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ तयार होते व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. चक्रीवादळात हवा एका कमी दाब असणार्‍या बिंदूच्या अवतीभोवती फार मोठ्या गतीने चक्राकार फिरत राहते. अशा वादळांचा साधारण वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. पण जेव्हा हे वादळ जमिनीला  टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते.
     
    ६)  उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने व दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या सरळ दिशेने वाहणा-या जोराच्या वा-यामुळे हवेमध्ये भोवरा निर्माण होतो. त्याची पोकळी व तीव्रता वाढत जाते व वादळ तयार होते.
     
    ७)  युनिवर्सिटी ऑफ मेलबर्नच्या संशोधकांनी प्रा. इयान यंग यांच्या नेतृत्वाखाली २०२० वर्षी केलेल्या संशोधनानुसार आगामी काळात जर पृथ्वीचे वातावरण जर असेच वाढत राहिले तर भविष्यात चक्रीवादळे व त्याचा प्रकोप हा खूप वाढणार आहे. त्यांनी १९८५ ते २०१८ पर्यंत ३१ उपग्रहाद्वारे पाठविलेल्या माहितीच्या आधारे व सुमारे ४ अब्ज निरीक्षण याआधारे आपला अहवाल तयार केला आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार मागील ३० वर्षात वादळी वार्‍यांचे प्रमाण प्रती सेकंद १.५ मीटर वेगाने वाढले आहे तसेच लाटांची उंची ३० सेंटीमीटरपर्यंत वाढली आहे. अशाच प्रकारचा बदल जर सातत्याने चालू राहिला तर महापूर व सागरी किनार्‍यांची धूप होऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात आहे.
     
    ८)  अजून एका संशोधकांच्या मते वादळांना कारणीभूत हे पृथ्वीवरील प्रदुर्षण आहे. कारण प्रदुर्षणामुळे ओझोनच्या थराला मोठे छिद्र पडले असून त्यामुळे महासागरात हे बदल घडत आहेत. 
     
    *   चक्रीवादळाच्या निर्मितीची वैशिष्ट्ये -
     
    १)  एखाद्या ठिकाणी तापमान जास्त झाले व इतर भागात ढगाळ वातावरणामुळे वा अन्य कारणांमुळे तापमान कमी झाले तर हा तापमानातील फरक भरून काढण्यासाठी हवा जोरात वाहू लागते. तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो.
     
    २)  समुद्रात, जलाशयात जेव्हा एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती वर्तुळाकार वारे फिरू लागले तेव्हा चक्रीवादळ तयार होते. उबदार समुद्राच्या पाण्यामुळे हवा वेगात वाहू लागते. जसंजसं उबदारपणा कमी होत जाते, तसतशी हवेतील उष्णता कमी होते. यामुळे एक चक्र तयार होतं.
     
    ३)  वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते, त्या मार्गावर वरील परिस्थितीनुसार ते तीव्र किंवा क्षीण होत जाते. 
     
    ४)  जर ते पाण्यावरून किंवा आर्द्र वा अतिउष्ण प्रदेशावरून जात असेल तर वादळाची ताकद वाढत जाते.
     
    ५)  जेव्हा जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ जाते किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपते तेव्हा ते शांत होते. जमिनीवर एकदा वादळ धडकले की, सागरी बाष्पाचा पुरवठा खंडित होतो. परिणामी ते अत्यंत वेगाने अवघ्या काही मिनिटांत नष्ट होते. 
     
    ६)  समुद्रातील पाण्याचं तापमान वाढत असल्यानं त्यामुळे भविष्यात हरिकेनची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. उष्ण वातावरणामुळे अधिक पाणी थांबवलं जातं आणि यामुळे हरिकेनची व्याप्ती वाढण्याची शक्यता असते. पण हवामान बदल आणि हरिकेन यांच्यातील संबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात. 

     
        वादळाची पूर्वसूचनाव बिनचूक माहिती -

     

     
    *   वादळाची पूर्वसूचना देण्यासाठी खालील माध्यमांतून मिळालेली माहिती उपयोगी ठरते -
    १)  बिनचूक अंदाज देणारी रडार यंत्रणा
    २)  उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे
    ३)  भूपृष्ठावरील निरीक्षणांवरून वारे कोणत्या दिशेने व कसे वाहत आहेत.
    ४)  सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) च्या सहायाने, सागरी भाग व जमीन तसेच इतर अडथळे यांच्या गणितीय मॉडेलच्या सहाय्याने दर काही सेकंदात वादळाचे अपडेट टिपता येते. परिणामी चक्रीवादळ धडकणार असल्यास त्याची अचूक सूचना देता येते. 

     
    *   चक्रीवादळाची वैशिष्ट्ये-

     

    १)  चक्रीवादळ हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणार्‍या हवेमुळे बनते.
    २)  सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.
    ३)  चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी साधारणपणे  ८ ते १० दिवसांचा (२४० ते २५० तास) कालावधी लागतो.
    ४)  चक्रीवादळांच्या निर्मितीची पूर्वकल्पना आपल्याला १० ते १२ दिवस अचूक मिळू शकते.
    ५)  वादळे ही समुद्रात किंवा सागरात निर्माण होतात आणि बाष्पाचा पुरवठा जोपर्यंत होतो आहे, तोपर्यंत ती जिवंत राहतात.
    ६)  वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
    ७)  चक्रीवादळ हे घड्याळ्याच्या दिशेने वरून खाली फिरते. 

        चक्री वादळाची संरचना -

     

    *   चक्री वादळाची संरचना त्याच्या विकासाच्या अवस्थेवर अवलंबून असते. विकासाच्या दृष्टीने खाली दिल्याप्रमाणे त्याच्या चार अवस्था आहेत -
     
    १)  आरंभावस्था : जेव्हा पृष्ठभागीय नकाशावर बंद वर्तुळाकार समदाब रेषा (सारखा वातावरणीय दाब असणार्‍या ठिकाणांतून जाणार्‍या रेषा) निर्माण होतात, तेव्हा ती अवस्था सुरू होते आणि सायक्लोन किंवा हरिकेन निर्माण होतो तेव्हा ही अवस्था संपते.
     
    २)  तीव्रता वाढीची अवस्था : मध्यवर्ती हवेचा दाब कमीत कमी होईपर्यंत तसेच तीव्रता अधिकतम होईपर्यंत ही अपरिपक्व अवस्था चालू असते. समदाब रेषा वर्तुळाकार होत जातात, तसेच रेषांची संख्या वाढत जाते.
     
    ३)  परिपक्व अवस्था : या अवस्थेनंतर सायक्लोनच्या तीव्रतेत वाढ होत नाही. समदाब बाहेरच्या बाजूस पसरून सायक्लोनचे क्षेत्र विस्तृत होते. थोड्या प्रमाणात तीव्रता कमी होण्यास सुरुवात होते.
     
    ४)  र्‍हासावस्था : किनार्‍यावर आदळल्याबरोबर सायक्लोनचा झपाट्याने र्‍हास होऊ लागतो. समुद्रावर असतानाही कधीकधी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सायक्लोनचा र्‍हास होत जातो.  
     
    *   चक्रीवादळाचा डोळा (नेत्र) -
     
    १)  चक्री वादळाची व्याप्ती व्यास ८० किमी. इतकी कमी असू शकते. तसेच ती ३,००० किमी. इतकी मोठी असू शकते. निरनिराळ्या सागरी प्रदेशांवर व्याप्तीच्या बाबतीत बरेच मोठे फरक दिसून येतात. त्याशिवाय वादळाची व्याप्ती वादळाच्या तीव्रतेवरही अवलंबून असते.
     
    २)  तीव्रतम वादळात ‘नेत्र’ म्हणजे वादळाचा वैशिष्ट्यपूर्ण गाभा निर्माण झालेला असतो. नेत्राचा सरासरी व्यास २० ते २५ किमी. असतो पण एखाद्या तीव्रतम चक्री वादळात हा व्यास १० किमी. इतका कमी तसेच ४५ किमी. इतका जास्त असतो. यास नेत्र म्हणण्याचे कारण असे की, या भागावर ढगाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे ह्या भागातून आकाश दिसते. या भागात वारा मंद वाहतो, तापमान आसपासच्या भागांपेक्षा जास्त असते आणि हवेस मंद अधोगती असते.
     
    ३)  नेत्राच्या भोवतालच्या क्षेत्रात त्याच्या मध्यभागापासून सु. २०० किमी.पर्यंत अतितीव्र वारे वाहतात व जोरदार पाऊस पडतो.
     
    ४)  त्यापुढे ५०० ते ८०० किमी.पर्यंत वार्‍याची गती, ढगाचे आणि पावसाचे प्रमाण कमी होत जाते आणि शेवटी वारा मंद होतो, ढगाचे प्रमाण बरेच कमी होते आणि पाऊस बंद झालेला असतो.
     
    ५)  चक्री वादळाचे हरिकेनमध्ये रूपांतर झालेले नसेल, तर केंद्रापासून सु. २०० किमी.पर्यंत तीव्र वारा वाहतो आणि जोराचा पाऊस पडतो. त्यापलीकडे वार्‍याची व पावसाची तीव्रता कमी कमी होते आणि ५०० ते ६०० किमी. अंतरावर वारा मंद झालेला असतो तसेच पाऊस बंद झालेला असतो.
     
    ६)  नेत्राचा भाग सोडल्यास चक्री वादळाच्या क्षेत्रावर तीव्र अभिसारण (हवा केंद्राकडे जाण्याची क्रिया) असून १ ते २ किमी. उंचीपर्यंत तीव्र ऊर्ध्व (वरच्या दिशेतील) गती असते. ती कमी होत जाऊन ६ किमी. उंचीवर अपसारण सुरू होते. अपसारणाची तीव्रता १०-१२ किमी. उंचीपर्यंत वाढत जाते. ह्या अपसरणामुळे वादळी क्षेत्राच्या आसपासच्या प्रदेशावर हवेस अधोगती प्राप्त होते. अशा प्रकारे वातावरणाच्या खालच्या थरात आसपासच्या प्रदेशावरून हवा वादळाच्या क्षेत्रात शिरते. वादळाच्या क्षेत्रात एकत्र आलेली हवा वर जाते आणि ती वरच्या पातळीवर पसरते आणि नंतर खाली सरकून सायक्लोनच्या आसपास भूपृष्ठावर येते. 
     
    ७)  हरिकेनच्या नेत्रात हवेचा दाब साधारणपणे ९०० ते ९४० मिलिबार असतो. एका हरिकेनमध्ये तो ८७० मिलिबार इतका कमी आढळलेला आहे.
     

        चक्रीवादळाची दिशा -

     

    *   पृथ्वी स्वतःभोवती २४ तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वार्‍याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो. ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो.
     
    *   चक्रीवादळाच्या मध्यभागी असणार्‍या केंद्राला ’आय’ किंवा ’डोळा’ म्हणतात. शेकडो किलोमीटचा महासागरावरून प्रवास केल्यानंतर या चक्रीवादळाचा परीघ काही किलोमीटर लांबीचा होतो. पण त्याचा वेग आणि शक्ती किनार्‍यावर धडकल्यावर कमी होऊ लागते. या धडकण्याला ’लँडफॉल’ असं म्हणतात. एकदा का किनार्‍याला लागलं की चक्रीवादळाला सतत होणारा आर्द्र हवेचा पुरवठा थांबतो. 
     
    *   चक्रीवादळांचा काळ -
     
    १)  भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात.
     
    २)  ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो.
     
    ३)  दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात.
     
    ४)  आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात. 

     
    *   चक्री वादळाचे आयुष्य आणि वेग -

     

     
    १)  चक्री वादळाचे आयुष्य ते सागराच्या कोणत्या भागात निर्माण झाले आहे यावर, तसेच त्याच्या गतीवर अवलंबून असते. उष्ण कटिबंधीय चक्री वादळाचे जास्तीत जास्त आयुष्य १२ दिवस आढळले आहे.
     
    २)  चक्री वादळ कधीकधी स्थिर राहते. उष्ण कटिबंधात त्याची गती साधारणपणे १० ते २० नॉट असते पण उष्ण कटिबंधातून समशीतोष्ण कटिबंधात प्रवेश केल्यानंतर चक्री वादळाचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होऊन त्याची गती २०-३० नॉट होते.
     
    ३)  चक्री वादळ म्हणजे वातावरणात चक्राकार फिरणारा तसेच पुढे सरकणारा एक स्तंभ असतो. त्यामुळे या स्तंभाच्या आसपास वातावरणातील हवेची जी गती असते त्या गतीवर चक्री वादळ सरकरण्याची गती अवलंबून राहते.
     
    ४)  वादळ सरकण्याची गती वातावरणात ६ ते ९ किमी. उंचीवर असलेल्या गतीच्या ६० ते ८० टक्के असते.
     
    ५)  वादळाच्या पुढील क्षेत्रावर असलेली वार्‍याची गती मागील क्षेत्रावरच्या वार्‍याच्या गतीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे वादळाची गती दर्शविते.  

     
    (२) चक्रीवादळांचे प्रकार

     

     
    *   वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. वातावरणविज्ञानात वादळ ही सर्वसाधारण संज्ञा वातावरणीय क्षोभांना म्हणजे खळबळाटांना लावण्यात येते. वातावरणात कधीकधी निर्माण होणार्‍या अस्थिरतेमुळे (उदा., हवामान, वारे, दाब वगैरेंमधील अस्थिरतेमुळे) क्षोभांची निर्मिती होते.
      

    *   वादळांमागील कारणे -

     

     
    १) जेथे तापमान जास्त असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो.
     
    २) तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर वादळे होत रहातात. पाण्यावरून किंवा आर्द्र वा अति उष्ण प्रदेशावरून जाताना वादळाची ताकद वाढते, आणि जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ आले, किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपली, की ते शांत होते.
     
    ३)  वातावरणात उंचीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले तरी तिथल्या जमिनीवर किंवा तिथल्या पाण्याच्या पृष्ठभागावर वादळाची निर्मिती होऊ शकते. आवर्त वारे व प्रत्यावर्त वारे यांची भूमिका वादळात महत्वाची आहे.यात आवर्त वारे महत्वाचे आहेत. उष्णकटिबंधीय भागात केंद्र भागी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यामुळे भोवतालच्या भागाकडून केंद्राकडे हवा वेगाने वाहते त्यामुळे वादळाची निर्मिती होते.  

     
    स्थानानुसार चक्रीवादळाचे प्रकार

     

     
    *   चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येते. हिंदी महासागरात चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणार्‍याला हरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते.
     
    सायक्लोन, टायफून, हरिकेन, टोर्नेडो व विलीविली
     
    १)  हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील वादळांना सायक्लोन उष्णकटिबंधीय वादळे म्हटले जाते. 
     
    २)  अटलांटिक महासागर, मध्य व ईशान्य प्रशांत महासागर, कॅरेबियन समुद्र व मेक्सिकोच्या उपसागरात वादळ निर्माण झाले की त्यांना हरिकेन म्हणतात.
     
    ३)  चीनचा समुद्र आणि प्रशांत महासागराच्या वायव्येला निर्माण झालेल्या वादळाला टायफून म्हणतात.
     
    ४)  जेव्हा वादळ जमिनीवर तयार होते तेव्हा आणि प्रचंड पाणी, बर्फ साठलेला ढग स्वत:भोवतीच गोलगोल फिरत खाली आले की त्याला टोरनॅडो म्हटले जाते. ढगफुटी आणि चक्रीवादळ यामधला हा प्रकार आहे.
     
    ५)  ऑस्ट्रेलियात चक्रीवादळांना विली-विली असे म्हटले जाते.
     

    *   अमेरिकेच्या नॅशनल ओशियानिक अँड अ‍ॅटमोस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या मते -

     

     
    १)  उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्यावेळी त्याला सायक्लोन म्हणावे. उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे.
     
    २)  हे सायक्लोन कमीत कमी ताशी ११९ किमी वेगानं येऊन धडकत असेल तर त्याच्या उगमानुसार त्याला हरिकेन किंवा टायफून असं संबोधलं जातं.
     
    ३)  वार्‍याच्या गतीनुसार हरिकेनचे वर्गीकरण हरिकन १ ते हरिकन ५ अशा गटांमध्ये केलं जातं.
     
    ४)  हरिकेन व टायफून ही चक्रीवादळं उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल असतात.
     
    ५)  उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात त्यांना हरिकेन असं संबोधलं जातं.
     
    ६)  वायव्य पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची वादळं टायफून म्हणून ओळखली जातात.
     
    ७)  दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात या वादळांना सायक्लोन म्हटलं जातं. 

     
    *   हरिकेन व टायफून ही चक्रीवादळ केव्हा येतात?

     

     
    १)  अटलांटिक महासागरात हरिकेन वादळं सामान्यतः १ जून ते ३० नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक वादळं याच कालावधीत येतात.
     
    २)  वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असं असलं तरी ही वादळं वर्षात कधीही तयार होऊ शकतात.
     
    ३)  दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतं.
     
    ४)  अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतंच येतं.
     
    ५)  दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतंच.
     
    निर्मितीनुसार चक्रीवादळांचे प्रकार 
     
    *   वादळांचे मुख्यतः पुढील ४ प्रकार आहेत -
     
    १)  प्रादेशिक स्वरूपाची वादळे. ही वादळे म्हणजे जोरात वाहणारे (तीव्र) वारेच असतात
    २)  लहान क्षेत्रावर होणारी वादळे
    ३)  मोठ्या क्षेत्रावर होणारी उष्ण कटिबंधीय चक्री वादळे
    ४)  अतिविस्तृत क्षेत्रावर होणारे समशीतोष्ण कटिबंधातील अभिसारी चक्रवात.
     

    *   निर्मितीनुसार चक्रीवादळे ५ प्रकारची आहेत -

     

    १)  उष्णकटिबंधीय चक्रवात
    २)  एक्स्ट्राट्रॉपिकल चक्रवात
    ३)  उपोष्णकटिबंधीय चक्रीवादळ
    ४)  ध्रुवीय चक्रवात
    ५)  मेसोसायक्लोन
     
    १) प्रादेशिक स्वरूपाची वादळे
     
    *   ही वादळे दक्षिण सैबीरिया, रशिया, पश्‍चिम यूरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे होतात. तेथे त्यांना काळोखी वादळे असे संबोधिले जाते. सहारातील वादळांत धूळ व रेती बरीच दूरपर्यंत वाहून नेली जाते. स्थानिक वार्‍याची गती कधीकधी हरिकेनमधील वार्‍याएवढी तीव्र होते. विशेष म्हणजे वार्‍यामुळे बरीच धूळ वा रेती उधळली जाऊन वाहून नेली जाते. 
     
    *   वादळातील घटकावरुन त्यांचे पडणारे उपप्रकार -
     
    १)  धुळीचे किंवा रेतीचे वादळ
    २)  घूर्णवात
    ३)  पावसाचे वादळ
    ४)  बर्फाचे वादळ
    ५)  मेघगर्जनेचे वादळ
    ६)  चक्रीवादळ

    *   धुळी वादळांची नावे -

     

     
    १)  ईजिप्त व पूर्व सहारामध्ये ‘खामसिन’
    २)  उत्तर सहारामध्ये ‘शेखाली’
    ३)  मध्य सहारात ‘हर्माटन’
    ४)  आग्नेय सहारामध्ये ‘हबूब’
    ५)  भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर ‘सिरोक्को’
    ६)  आशिया मायनर व अरेबियात ‘सिमूम’

     
    २) लहान क्षेत्रांवर होणारी वादळे

     

     
    *   यामध्ये पुढील वादळांचा सामावेश होतो -
    १)  गडगडाटी वादळ,
    २)  धुळी वादळ,
    ३)  घूर्णवाती वादळ
    ४)  जलशुंडा

     
    *   गडगडाटी वादळ आणि धुळी वादळ  -

     

     
    १)  अतिउंच वाढलेल्या गर्जन्मेघामुळे (क्युमुलोनिंबस ढगामुळे) गडगडाटी वादळ निर्माण होते. वातावरणात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हवेस उदग्र (उभ्या दिशेत) गती प्राप्त होते आणि हवा भूपृष्ठावरून वर जाते. त्यामुळे राशिमेघ (क्युमुलस) हे घनदाट ढग निर्माण होऊन त्यांची उंची वाढत जाते आणि त्यांचे रूपांतर गर्जन्मेघात होते.
     
    २)  विजा चमकणे, गडगडाट, जोरदार वृष्टी, गारांचा पाऊस इ. आविष्कार ह्या वादळात निर्माण होतात. तसेच वर गेलेली आणि थंड झालेली हवा तीव्र गतीने (जोराने) खाली येऊन चंडवात अल्पावधीत एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटात क्रमशः मंद हात जाणारा वारा निर्माण होतो.
     
    ३)  गडगडाटी वादळाचे क्षेत्र सु. १५ किमी. x १५ किमी. एवढे असते आणि कालावधी अर्धा ते एक तास असतो परंतु कधीकधी एका वादळापासून जवळपास दुसरी वादळे निर्माण होऊन गडगडाटी वादळ २ ते ३ तासांपर्यंत चालू राहते आणि एकंदर वादळी क्षेत्राची वाढ होते.
     
    ४)  उष्ण कटिबंधीय प्रदेशांत ही वादळे प्रामुख्याने दुपारी वा संध्याकाळी होतात.
     
    ५)  समशीतोष्ण कटिबंधात ती शीत सीमापृष्ठाजवळ उष्णार्द्र हवा व शीत शुष्क हवा विभक्त करणार्‍या पृष्ठाजवळहृसीमापृष्ठ होतात.
     
    ६)  कधीकधी वादळात पावसाऐवजी हिम पडते किंवा गारा पडतात. त्या वेळी त्यास हिम वादळ किंवा गारांचे वादळ असे संबोधिले जाते.
     
    ७)  धुळी वादळ गडगडाटी वादळासारखेच असते. यात हवा बरीच कोरडी असल्यामुळे पाऊस किंवा गारा पडत नाहीत पण धूळ मात्र बरीच उंच उधळली जाते आणि दृश्यमानता फारच कमी होते.
     

    *   घूर्णवाती वादळ  -

     

     
    १)  हे वादळ वावटळीसारखे असून यात हवेची गती चक्राकार असते. घूर्णनाची (वर्तुळाकार फिरण्याची) दिशा घड्याळाच्या काट्याप्रमाणे अथवा त्याच्या उलट अशी कोणतीही असते.
     
    २)  ढगातून एक सोंडेसारखा भाग खाली आलेला असतो. कधीकधी तोंड भूपृष्ठापर्यंत पोहोचते. ही सोंड तीव्र गतीने गोल फिरणार्‍या भोवर्‍यासारखी असते. ह्या सोंडेमुळेच फार विध्वंस होतो.
     
    ३)  वादळाच्या केंद्राजवळ हवेचा दाब बराच कमी असतो आणि हवेची उदग्र गती फार तीव्र असते. त्यामुळे अशा वादळाच्या सपाट्यात सापडलेली घरांची छप्परे, माणसे, गाई, म्हशी वर फेकल्या जातात. मालमत्ता आणि जीवित यांची बरीच हानी होते.
     
    ४)  या वादळाची रुंदी सु. २००-४०० मी. असते पण ती काही मीटरपासून २,००० ते ३,००० मी. एवढी असू शकते. उंची सरासरी ४०० मी.च्या आसपास असते पण ती ५० ते २,००० मी.पर्यंत असू शकते.
     
    ५)  वादळाच्या मार्गाची लांबी ५ ते ३० किमी. असते. यात वार्‍याची गती ३०० ते ५०० किमी./तास इतकी असू शकते. वादळाची गती सु. १५ ते ५० किमी./तास एवढी असते.
     
    ६)  अशी वादळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्य भागामध्ये उन्हाळ्यात बरीच होतात. त्यामुळे फार नुकसान होते. या वादळात जोराची वृष्टी, विजा चमकणे, गडगडाट, गारा इ. आविष्कार होतात
     

    *   जलशुंडा -

     

     
    १)  सागरावर होणारा हा आविष्कार घूर्णवाती वादळासारखा असून साधारणपणे तो उष्ण कटिबंधात होतो. ढगांतून एक सोंडेसारखा भाग खाली येतो.
     
    २)  या सोंडेचा खालचा भाग खाली येऊन तुषारांच्या ढगात शिरतो. तुषारांचा स्तंभ ६-१० मी. व्यासापासून ५०-६० मी.व्यासापर्यंत असू शकतो.
     
    ३)  ढगाचा तळ ६० ते ३०० मी. उंच असू शकतो. जलशुंडेचा कालावधी १० ते ३० मिनिटे असतो.
     
    ४)  वारा चक्राकार असून वार्‍याची गती तीव्र असते.
     

    ३) उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे

     

     
    *   या वादळात हवेला भोवर्‍यासारखी चक्राकार गती असते. हे वादळ म्हणजे उष्ण कटिबंधातील एक न्यून दाब (कमी दाबाचे) क्षेत्र असते. न्यून दाबाची तीव्रता एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे पोहोचली म्हणजे न्यून दाब क्षेत्राला चक्री वादळ असे संबोधिले जाते.
     
    १)  उत्तर गोलार्धात ही वादळे प्रथम पश्‍चिमेकडे, नंतर वायव्येकडे, नंतर उत्तरेकडे आणि शेवटी ईशान्येकडे सरकतात. ईशान्येकडे सरकल्यानंतर ती समशीतोष्ण कटिबंधात प्रवेश करतात आणि तेथे त्यांचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होते.
     
    २)  दक्षिण गोलार्धात सुरुवातीला पश्‍चिमेकडे, नंतर नैर्ऋत्येकडे, नंतर दक्षिणेकडे आणि शेवटी आग्नेयीकडे सरकल्यावर त्यांचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होते.
     
    ३)  चक्री वादळाची तीव्रता न्यून दाब क्षेत्राशी संबंधित असलेल्या वार्‍याच्या गतीवरून ठरविली जाते.
     
    ४)  चक्री वादळात वार्‍याची गती ३४ नॉट (१ नॉट= १.८४ किमी./तास) किंवा ६३ किमी./तास एवढी वा जास्त असते,
     
    ५)  तीव्र चक्री वादळात ती ४८ नॉट वा ८८ किमी./ तास वा अधिक असते आणि
     
    ६)  हरिकेन, टायफून, सायक्लोन, विलीविली यांमध्ये ती ६४ नॉट वा ११८ किमी./तास वा जास्त असते.
      

    *   निर्मितीचे क्षेत्रे आणि गमनमार्ग  -

     

     
    १)  चक्री वादळे सागरावर ५ ते २० या अक्षांशीय पट्ट्यात निर्माण होतात.
     
    २)  फक्त दक्षिण अटलांटिक महासागरात चक्री वादळे निर्माण होत नाहीत.
     
    ३)  चक्री वादळाचा उगम २६०-२७० से. तापमान असलेल्या सागरी पृष्ठावर होतो.
      

    *   चक्री वादळांचा ऋतू  -

     

     
    १)  उत्तर गोलार्धात साधारणपणे ही वादळे जून ते नोव्हेंबर या कालावधीत उगम पावतात. निर्मितीचे प्रमाण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सर्वांत जास्त असते.
     
    २)  दक्षिण गोलार्धात चक्री वादळे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत उगम पावतात आणि निर्मितीचे प्रमाण जानेवारी ते मार्चमध्ये सर्वांत जास्त असते.
     
    *   अती तीव्र चक्री वादळांना निरनिराळी स्थानिक नावे आहेत -
     
    १)  पश्‍चिम अटलांटिक महासागरात हरिकेन
     
    २)  पश्‍चिम पॅसिफिक महासागरात टायफून
     
    ३)  दक्षिण हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर येथे सायक्लोन
     
    ४)  ऑस्ट्रेलियाच्या आसपासच्या सागरी प्रदेशात विलीविली.
     

    ४) समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रीवादळ

     

     
    *   कधीकधी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ समशीतोष्ण कटिबंधात शिरते, तेव्हा त्याचे रूपांतर समशीतोष्ण कटिबंधीय चक्रवातात होते. त्यांची निर्मिती  उत्तर व दक्षिण गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधांत (अक्षांश ३५ ते ६५) होते. साधारणपणे हे पश्‍चिमेकडून पूर्वेकडे सरकतात आणि यांची क्षेत्रीय व्याप्ती बरीच मोठी असते (२,००० ते ४,००० किमी. व्यास). 
     
    १)  उच्च अक्षांशांस वायुराशी ज्याची हवामानविषयक वैशिष्ट्ये, विशेषतः तापमान वा आर्द्रता यांचे वितरण, ही क्षैतिज पातळीत जवळजवळ एकसारखी असते. अशा वातावरणाच्या विस्तृत भागात वायुराशि थंड व कोरडी असून तिची घनता जास्त असते. याच्या उलट मध्य अक्षांशांस वायुराशी उबदार असते आणि हवेची घनता कमी असते. 
     
    २)  कधीकधी एखाद्या भागातील उबदार हवेचे थंडगार हवेवर आक्रमण होऊन वातावरणात अस्थिरता निर्माण होते. ह्या अस्थिरतेमुळे एक न्यून दाब क्षेत्र निर्माण होते. वातावरणातील काही घडामोडींमुळे, विशेषतः वातावरणाच्या वरच्या थरातील, न्यून दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे अभिसारी चक्रवातात रूपांतर होते.
      

    *   अभिसारी चक्रवातात खालील गोष्टी आढळतात -

     

     
    १)  उबदार सीमापृष्ठ : उबदार हवा शीत हवेवर चढते. यामुळे अक्रमी शीतलीकरण होऊन ढग व पाऊस वा हिम यांची निर्मिती होते.
     
    २)  उबदार विभाग :  उबदार व दमट हवेत स्थिरता असल्यामुळे येथे आकाश निरभ्र असते किंवा धुके अथवा तुषारवृष्टी होते.
     
    ३)  शीत सीमापृष्ठ : शीत हवा उबदार हवेला पुढे आणी वर ढकलते. त्यामुळे उबदार हवा थंड हवेवर चढते. जमिनीस लागून असलेल्या थंड हवेची गती घर्षणामुळे कमी होते पण वाढत्या उंचीबरोबर घर्षणाचा प्रभाव कमी होऊन ठराविक उंचीपर्यंत हवेची गती वाढत जाते. त्यामुळे थंड हवा नाकासारखा आकार धारण करते.
     

     वेगानुसार चक्रीवादळाचे प्रकार

     

     
    *   सेफिर-सिम्पसन चक्रीवादळ तीव्रतेच्या स्केलमध्ये वाराच्या वेगानुसार चक्रीवादळ १ ते ५ पर्यंत आहे.
    १)  श्रेणी-१ ताशी ९० ते १२४ किमी
    २)  श्रेणी-२ ताशी १२५ ते १६४ किमी
    ३)  श्रेणी-३ ताशी १६५ ते २२४ किमी
    ४)  श्रेणी-४ ताशी २२५ ते २७९ किमी
    ५)  श्रेणी-५ ताशी २८० किमी किंवा त्यापेक्षा जास्त
     

    *   वातावरणीय स्थिती आणि  वार्‍यांचा वेग (प्रतितास किमी) -

     

    १)  कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर) - ३२ पेक्षा कमी
    २)  कमी दाब (डिप्रेशन) - ३२ ते ५०
    ३)  खोल कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) - ५१ ते ५९
    ४)  चक्रीवादळ (सायक्लॉनिक स्टॉर्म) - ६० ते ९०
    ५)  तीव्र चक्रीवादळ (सिव्हिेअर सायक्लॉनिक स्टॉर्म) - ९० ते ११९
    ६)  अतितीव्र चक्रीवादळ (व्हेरी सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म) - ११९ ते २२०
    ७)  सुपर सायक्लोन - २२० पेक्षा अधिक
     

    *   चक्रीवादळाचे मापन कसे होते?

     

    १)  चक्रीवादळाच्या तीव्रतेचे मापन श्रेणींमध्ये करण्यात येते. चक्रीवादळातील वार्‍यांच्या वेगावरुन त्याला श्रेणी देण्यात येते. हे वारे ताशी ९० कि.मी. ते कमाल ताशी २८० कि.मी. या वेगाने वाहतात.
    २)  वार्‍यांच्या वेगावर त्याची विध्वंसक शक्ती अवलंबून असते. हा वेग विविध उपकरणे व उपग्रहानी पाठवलेली माहिती याआधारे मोजला जातो.
     

    *   चक्रीवादळांचे मोजमाप करताना पुढील घटक महत्त्वाचे आहेत -

     

    १)  वातावरणीय स्थिती
    २)  वार्‍यांचा वेग (प्रतितास किमीमध्ये)
    ३)  कमी दाबाचा पट्टा
    ४)  वातावरणशास्त्र सामग्री (क्लायमॅटॉलॉजी)
    ५)  रडार वापरून
    ६)  उपग्रहाची मदत घेऊन
    ७)  सामान्य सरासरीचे अवलोकन
     
    जगातील सर्वात जास्त वेग असलेली वादळे
     
    १)  नॅन्सी वादळ - १९६१ साली जपानच्या तटावर आलेले हे वादळ ७ सप्टेंबर १९६१ पासून बनण्यास सुरुवात झाली, या वादळाने १० दिवस थैमान घालते होते. याचा वेग सर्वात जास्त ३४५ किमी प्रती तास होता. जो इतिहासातील सर्वात जास्त वेग होता. नॅन्सी वादळामुळे जपानमध्ये १९१ लोकांचा मृत्यू झाला.
     
    २)  वायलेट वादळ - हे वादळ १९६१ मध्ये जपानच्या तटावर ३३० किमी प्रती तास या वेगाने धडकले होते. यामध्ये फार मोठी जीवितहानी जरी झाली नाही तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले होते.
     
    ३)  आइडा वादळ - आइडा वादळ सप्टेंबर १९५८ मध्ये १८५ किमी प्रती तास या वेगाने जपानच्या किनार्‍यावर धडकले आणि त्यानंतर त्याचा वेग ताशी ३२५ किलोमीटर वाढला. या वादळामुळे जपानमध्ये एकूण १२६९ लोकांचा मृत्यू झाला, तसेच जवळपास ३२५ कोटींचे नुकसान झाले होते.
     
    ४)  सॅली वादळ - सॅली हे वादळ ३ सप्टेंबर १९६४ मध्ये पोनोपेच्या जवळ तयार झाले आणि पश्‍चिमेकडे सरकले. चार दिवसांनी या वादळाचा वेग ताशी ३१४ किमी एवढा झाला. हे वादळ ९ सप्टेंबरला फिलिपिन्सला पोहचल्यानंतर आणि त्यानंतर १८५ किमी प्रती तास या वेगाने १० सप्टेंबरला चीनला पोहोचले. हे वादळ त्यावेळेच्या प्रचंड वादळांपैकी एक होते.
     
    ५)  टीप वादळ - १२ ऑक्टोबर १९७९ मध्ये जपानला या वादळाचा तडाखा बसला. या वादळाचा वेग ताशी ३०५ किमी एवढा होता. या वादळामुळे जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. तसेच, कृषी आणि मासेमारीचा उद्योगाचे करोडोंचे नुकसान झाले.
     
    ६)  मोरा वादळ -  मोरा वादळ हे ३० ऑगस्ट १९६६ मध्ये तयार झाले होते आणि ५ सप्टेंबर १९६६ ला ओकिनावा बेटाच्या जवळ धडकले होते. या वादळाचा वेग २८० किमी प्रती तास एवढा होता. यामुळे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण एक गोष्ट जमेची होती कि या वादळामुळे कोणत्याही माणसाला आपला जीव गमवावा लागला नाही. याचा वेग इतका प्रचंड होता कि ७ सप्टेंबर १९६६ ला हे वादळ उत्तर - पूर्व चीनला होते आणि ९ सप्टेंबरला १९६६ मध्ये कोरियाला पोहचले.
     
    ७)  कॅटरीना वादळ - कॅटरीना हे ऑगस्ट २००५ मध्ये अमेरिकेच्या लुसियाना आणि मिसिसिपीमध्ये आले होते. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली. २३ ऑगस्ट २००५ ला हे वादळ ताशी २८० किमी या वेगाने तयार झाले होते आणि हा वेग आठ दिवसांपर्यंत टिकून राहिले. कॅटरीना वादळामुळे एकूण १८३३ लोकांचा मृत्यू झाला, तसेच एकूण १०८ अब्ज अमेरिकेन डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान झाले.
     
    ८)  अँड्रू वादळ - अँड्रू वादळ हे १६ ऑगस्ट १९९२ ला तयार होण्यास सुरुवात झाली होती आणि २८ ऑगस्ट १९९२ ला फ्लोरिडा, दक्षिण - पश्‍चिम लुसियानामध्ये धडकले. या वादळाचा वेग ताशी २८० किमी होता. या वादळामुळे एकूण ६५ लोकांचा मृत्यू झाला, तसेच २६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स संपत्तीचे नुकसान झाले.
       
    (३) चक्रीवादळांचे नामकरण

     

     
         वेगवेगळ्या देशात धडकणारी चक्रीवादळ आणि चक्रीवादळांना नाव दिले की त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणे व लक्षात ठेवणे सोपे जाते. किनारपट्टीवरच्या लोकांना वादळाचा धोका कळावा म्हणून अशी नावे देण्याचा ट्रेंड सुरू झाला.
      

    १)  हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणार्‍या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळांचे नामकरण करतात.

     

     
    २)  संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते. एखाद्या देशांमध्ये वादळ पोहोचताच यादीतील वेगवेगळी सोपी नावे दिली जातात. यामुळे चक्रीवादळाची ओळख पटविणे सोपे जाते आणि बचाव कार्य सुरळीतपणे राबविण्यासही या नावांची मदत होते.
     
    ३)  एखाद्या चक्रीवादळाचा वेग ३४ नॉटिकल मैल प्रति तासांपेक्षा जास्त असेल तर त्याला विशेष नाव देणे आवश्यक असते.
     
    ४)  १९५३ मध्ये चक्रीवादळांचे नाव ठेवण्याची सुरुवात अटलांटिक क्षेत्रात एका करारानुसार झाली. ही पद्धत ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञांनी सुरु केली. यासाठी मियामी येथील राष्ट्रीय हरिकेन सेंटरने पुढाकार घेतला होता. जागा बदलते तसे या चक्रीवादळांना वेगवेगळी नावं दिली जातात.
     
    ५)  ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात. टायफून हैयान किंवा हरिकेन कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली आहेत.
     
    ६)  २००० च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्र यांत येणार्‍या ८ देशांनी अशा नावांची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केली होती. त्यातली ५० टक्के नावं आधीच वापरली गेली आहेत.
     
    ७)  २००४ पासून भारतात वादळांच्या नामकरणाला सुरुवात झाली.
     
    ८)  सामान्य नागरिकसुद्धा चक्रीवादळाला नाव सुचवू शकतात. तशी सुविधा भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
     
    ९)  चक्रीवादळासाठी नावे वापरणारी पहिली व्यक्ती म्हणजे ऑस्ट्रेलियन क्लेमेंट रॅगे. १८०० च्या उत्तरार्धात त्याने ग्रीक वर्णमाला नंतर चक्रीवादळाचे नाव देण्यास सुरवात केली. जेव्हा त्याची अक्षरे संपली, तेव्हा त्याने सामान्य साऊथ सीस बेटातील मुलींच्या नावे चक्रीवादळांना दिली. 
      

    *   चक्रीवादळाला नाव कशासाठी ?

     

     
    १)  प्रत्येक चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे.
    २)  त्याच्या समुद्रावरील विकासाविषयी जनजागृती व्हावी.
    ३)  एकाच वेळी दोन किंवा अधिक चक्रीवादळे निर्माण झाल्यास संभ्रम निर्माण होऊ नये.
    ४)  चक्रीवादळ स्मरणात राहावे.
    ५)  चक्रीवादळाविषयीची माहिती कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी.
     

     *   जगातील वादळाचे नावे पाच समित्या ठरवितात -

     

    १)  इस्केप टाइफून कमेटी
    २)  इस्केप पैनल ऑफ ट्रॉपिकल साइक्लोन
    ३)  आरए - १ ट्रॉपिकल साइक्लोन कमेटी
    ४)  आरए - ४ ट्रॉपिकल साइक्लोन कमेटी
    ५)  आरए - ५ ट्रॉपिकल साइक्लोन कमेटी
     

     *   महासागरानुसार झाल्या समित्या -

     

    १)  जगभरात वादळांची नावे समान नसतात. महासागरांच्या विभागानुसार समिती स्थापन झाल्या असून, त्या त्यांच्या भागात आलेल्या वादळांची नावे ठरवतात.
    २)  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांची नावे दिल्लीतील विभागीय विशेष हवामान केंद्र (रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटर) ठरवते.
     

     *   चक्रीवादळाची नावे ठरवताना पुढील निकष पाळले जातात -

     

    १)  चक्रीवादळांना दिलेले नाव छोटे व लक्षवेधी असावे, उच्चार सोपा असावा आणि ते सहजतेने लोकांमध्ये प्रचलित होणारे असावे अशी अपेक्षा असते. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.
    २)  संबंधित देशांच्या भाषेत असणार्‍या या नावांमधून निसर्गातील विविध घटक किंवा संस्कृतीची झलक दिसत असते. उपखंडातील त्या-त्या देशाची ओळख किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाब त्या नावामध्ये असावी. 
    ३)  सदर नाव सामाजिक-धार्मिक तेढ निर्माण करणारे नसावे.
    ४)  काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात.
    ५)  जी वादळं प्रचंड नुकसान करून जातात, त्यांची नावे यादीतून कायमची काढली जातात.
      

    उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावे

     

     
    १)  जगभरातील चक्रीवादळांची नावं क्षेत्रीय विशिष्ट हवामान विज्ञान केंद्र (आरएसएमसी) आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ इशारा केंद्रांद्वारे (टीसीडब्ल्यूसी) देण्यात आली आहेत.
     
    २)  २००० साली झालेल्या २७ व्या अधिवेशनात, जागतिक हवामान संस्था आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने, आशिया आणि पॅसिफिकसाठी, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावावर सहमती दर्शविली.
     
    ३)  भारतीय उपखंडातील वादळांसाठी २०१८ पूर्वी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या ८ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात असून ही नावे ओळीने देण्याची पद्धत होती. सध्या यात ६ देशांची भर पडल्याने आता एकूण १३ देश चक्रीवादळांचे नामकरण करतात.
     
    ४)  २०१८ मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि येमेन या देशांनाही यात सामिल करण्यात आलं. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील नावे ठरविण्याचा अधिकार १३ देशांना जागतिक हवामान संघटनेने बहाल केला आहे.
     
    ५)  नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या १३ देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी १३ अशा एकूण १६९ नावांचा समावेश करण्यात आला आहे.
     
    ६)  इंग्रजी वर्णमालेनुसार सदस्य देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून वादळाच्या नावाचा क्रम निश्‍चित केला जातो. सर्वांत आधी बांगलादेश, भारत, मालदीव आणि यानंतर म्यानमारचे व शेवटी येमेनचे नाव येते.
     
    ७)  एकापाठोपाठ निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना बांगलादेशपासून येमेनपर्यंत १३ देशांनी सुचवलेली नावे ओळीने देण्यात येतात. आधी गंमतीने महिलांची नावे या चक्रीवादळांना दिली जात.
     
    ८)  पहिल्या १३ नावांचा संच संपला कि पुढील१३ नावांचा संच वापरण्यात येतो.
     
    ९)  चक्रीवादळांच्या नव्या यादीमध्ये भारताने सुचवलेल्या गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झोर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, घुरनी, अंबुड, जलाधी आणि वेग या १३ नावांचा समावेश आहे.
      

    *   चक्रीवादळांची  पूर्वीची ६४ नावे -

     

     
    १)  बांगलादेश : ओनिल, ओग्नी, निशा, गिरी, हेलन, चंपाला, ओखी, फनी.
    २)  भारत : अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू.
    ३)  मालदीव : हिब्रू, गोनू, ऐला, कैला, मादी, रोनू, मेकुनू, हिक्का.
    ४)  म्यानमार : प्यार, येमयीन, फॅन, ठाणे, नौक, कँट, दाय, कायर, तौक्ते.
    ५)  ओमान : बाझ, सीदर, वर्ड, मृजन, हुडहुड, नाडा, लुबन, महा.
    ६)  पाकिस्तान : पुनूस, नर्गिसलैला, नीलम, निलोफर, वरध, तितली, बुलबुल.
    ७)  श्रीलंका : माला, रश्मी, बंडू, वियारू, अशोबा, मरूथा, गज, पवन.
    ८)  थायलंड : मुकदा, खाई-मूक, फेट, फायलीन, कोमेन, मोरा, फेथाई, अंफान
     

     *   चक्रीवादळांची अलीकडची नावे -

     

    १)  २०२१ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव दिलं गेलं.
    २)  २०२० मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या व महाराष्ट्रात आलेल्या चक्रीवादळाला निसगर् हे नाव देण्यात आलं होतं.
    ३)  २०२० मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या आंफन महाचक्रीवादळाला थायलंड देशाने नाव दिले होते. २० वर्षांतील हे सर्वात मोठे हे वादळ होते. (२००४ साली तयार करण्यात आलेल्या वादळाच्या यादीतील शेवटचे नाव)
    ४)  २०१६ मध्ये बंगाल या उपसागरात निर्माण झालेल्या एका वादळाला ‘क्यांत’ हे म्यानमारनं दिलं होतं.
    ५)  २०१७ सप्टेंबर  (बंगालचा उपसागर) - मारुथ
    ६)  २०१७ मे (बंगालचा उपसागर) - मोरा
    ७)  २०१६ - वरदाह , ओखी, सागर
    ८)  २०१४ मध्ये ‘हुडहुड’ वादळाने पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा यांसारख्या समुद्रकिनार्‍यावरच्या राज्याशिवाय उत्तर प्रदेशसहीत अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडवला होता.
    ९)  २००५ साली अमेरिकेतील न्यू एरोलिना प्रांतात आलेल्या ‘कॅटरिना’ वादळाने प्रचंड नुकसान केले, त्यामुळे ते नाव यादीतून काढले गेले. कॅटरिना हे नाव अमेरिकेने दिले होते.
     

     *   जगात चक्रीवादळाची नावे कशी ठेवली जातात ?

     

     
    १)  विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. 
     
    २)  १९५३ पासून अटलांटिक समुद्रात येणार्‍या वादळांना ’नॅशनल हरिकेन सेंटर’ने दिलेल्या यादीनुसार नाव दिले जाते.
     
    ३)  जागतिक हवामान संघटनेकडूनही वादळांच्या नावाची यादी सातत्याने अपडेट होत असते. दर सहा वर्षांनी या नावांची पुनरावृत्ती होते.
     
    ४)  पूर्वी वादळांना गावांची नावे दिली जात होती. त्यानंतर नावांच्या निश्‍चितीत सुसूत्रता आणण्यासाठी वादळांना महिलांची नावे देण्यास सुरुवात झाली. यावर काही महिला संघटनांनी आक्षेप घेतल्यावर १९८० च्या दशकात वादळांना पुरुषांचीही नावे मिळाली.
     
    ५)  १९७९ मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने ती देण्यासाठी एक यादी बनविली.
     
    ६)  २००० पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात. निसर्गाशी संबंधीत/खाद्यपदार्थाची ती नावे आहेत.
     
    ७)  जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची तसेच चक्रीवादळांची यादी तयार करण्यात आलेली असून साधारणतः ६ वर्षांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून पुन्हा सुरू करतात.
     
    ८)  अमेरिकेत पहिल्यांदा येणार्‍या वादळाचे नाव पुरुषाच्या नावावरून आणि दुसर्‍यांदा येणार्‍या वादळाचे नाव स्त्रीच्या नावावरून ठेवले जाते.
     
    ९)  ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञ आपल्याला न आवडणार्‍या राजकारणी लोकांचे नाव देत असत.
     
    १०) अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत.
      

    (४) चक्रीवादळामुळे होणारा विनाश

     

     
    *   समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते. चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. इतकी मोठी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवते -
     
    १)  चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणार्‍या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात.
     
    २)  दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते.
     
    ३)  चक्रीवादळाचा तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत बसतो. कमी दाब आणि वेगवान वार्‍यांमुळे लँडफॉलदरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनार्‍यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती असल्यास शेकडो हेक्टरची जमीन काही काळासाठी नापीक होते.
      
    *   वादळाच्या वरील तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्य, पुनर्वस हे प्रश्‍न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहते.

     

      

    *   चक्रीवादळ विध्वसंक का ठरते?

     

     
    १)  चक्रीवादळात वार्‍यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वार्‍यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो. वार्‍याच्या प्रचंड वेगामुळे घरं व झाडं पडू शकतात.
     
    २)  चक्रीवादळांची तीव्रता, वार्‍याचा वेग, चक्राकार स्थितीचा आकार आणि त्यांचा दाब किती आहे, यानुसार त्याचे किती पडसाद उमटू शकतात, हे निश्‍चित केले जाते.
     
    ३)  वादळादरम्यान प्रचंड लाटा तयार होतात. ज्यावेळेस या लाटा किनार्‍यावर पोहोचतात तेव्हा त्यांच्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते.
     

     *   वादळाची संहारक क्षमता यामुळे ठरते -

     

     १)  वादळाचा आकार आणि क्षमता
    २)  वादळाचा पुढे सरकण्याचा वेग
    ३)  वारे वाहत असल्याचा काळ
    ४)  वादळातील पाऊस पाडण्याची क्षमता
    ५)  जमिनीवर टेकल्यावर त्याच्या दिशेत व क्षमतेत होत असलेला बदल
    ६)  वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या जमिनीवरील लोकवस्ती व आपत्कालीन यंत्रणा
      

    *   चक्री वादळामुळे होणारा विध्वंस  -

     

     
    १)  झंजावात किंवा सोसाट्याचा वारा : यात वार्‍याची गती सामान्यतः ४० ते १०० नॉट असते पण अतितीव्र चक्री वादळात ती २०० नॉट अथवा त्यापलीकडे पोहोचली असल्याचा निष्कर्ष अभियंत्यांनी झालेल्या विध्वंसावरून काढलेला आहे. वेगमापकाने जास्तीत जास्त मापलेली गती सु. १५० नॉट आहे, त्यापेक्षा वेगवान वार्‍यापुढे वेगमापक टिकू शकत नाही. चक्री वादळातील अतितीव्र वार्‍याच्या गतीची मापने व त्याचे अंदाज जमिनीवर घेतलेले आहेत. समुद्रावर यासंबंधी अंदाज घेणे फार कठीण आहे. भूपृष्ठ समुद्रपृष्ठापेक्षा बरेच खडबडीत असते, त्यामुळे समुद्रावरील अतितीव्र वादळी वारा जमिनीवरील अतितीव्र वादळी वार्‍यापेक्षा जास्त वेगवान असतो. अतितीव्र वार्‍यामुळे जीविताची व मालमत्तेची बरीच हानी होते.
     
    २)  पूर : चक्री वादळातील अखंड मुसळधार पावसामुळे जोरदार पूर येतो. ह्या पुरामुळे मालमत्तेची हानी तसेच प्राणहानी फार होते
     
    ३)  चक्री वादळ निर्मित लाट : चक्री वादळ अतितीव्र असते तेव्हा त्यात मध्यभागी नेत्र असतो. येथे हवेचा दाब फारच कमी असतो. ह्या भागात समुद्राची पातळी वर उचलली जाते. त्यामुळे जेव्हा अतितीव्र चक्री वादळ समुद्रकिनार्‍यावर आदळते, तेव्हा समुद्रकिनार्‍यावर व आतील भागात पाण्याचा मोठा लोंढा पसरतो. त्यामुळे भयंकर प्राणहानी आणि मालमत्तेची हानी होते. ही लाट ३ ते ६ मी. उंच असू शकते.
     
    ४)  चक्री वादळ निर्मित भरती  : अतितीव्र वार्‍यामुळे समुद्रकिनार्‍याजवळ भरती येते. अशी भरती १ ते ३ मी. उंच असू शकते. नेहमीची भरती आणि चक्री वादळामुळे निर्माण झालेली भरती यांची वेळ जुळून आली, तर भरतीमुळे अतोनात नुकसान होते. आर. एल्. सदर्न ह्या शास्त्रज्ञांनी १९६४ ते १९७८ या १४ वर्षात उष्ण कटिबंधीय चक्री वादळे, तसेच भूकंप व त्याने निर्माण होणार्‍या लाटा, पूर, घूर्णवाती व तीव्र स्थानिक वादळे, हिमलोट, भूमिपात, ज्वालामुखी उद्रेक, उष्णतेची वा थंडीची लाट वगैरे इतर नैसर्गिक आपत्तींमुळे जगात झालेल्या प्राणहानीची, तसेच प्रत्येक प्रकारच्या एका आपत्तीत जास्तीत जास्त प्राणहानी किती झाली याचीही माहिती गोळा केली आहे. या माहितीवरून असे दिसून येते की, उष्ण कटिबंधीय चक्री वादळामुळे सर्वांत जास्त प्राणहानी होते.
      

    वार्‍याच्या वेगानुसार होणार्‍या नुकसानीचा अंदाज

     

     
    *   सेफिर-सिम्पसन चक्रीवादळ  स्केलनुसार होणारे नुकसान -
     
    १)  वर्ग १: वारा वेग ११९ आणि १५३ किमी / तासाच्या दरम्यान - यामुळे किनारपट्टीवर पूर ओसरतो आणि काही बंदरांचे नुकसान होते.
    २)  वर्ग २: वारा वेग १५४ ते १७७ किमी / तासाच्या दरम्यान - छप्पर, दारे आणि खिडक्या तसेच किनारपट्टीचे क्षेत्र नुकसान करतात.
    ३)  वर्ग ३: वारा वेग १७८ ते २०९ किमी / तासाच्या दरम्यान - यामुळे छोट्या इमारतींमध्ये, विशेषतः किनारपट्टीच्या भागात स्ट्रक्चरल नुकसान होते आणि मोबाइल घरे नष्ट करतात.
    ४)  वर्ग ४: वारा वेग २१० ते २४९ किमी / तासाच्या दरम्यान - यामुळे संरक्षक संरचनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, छोट्या इमारतींचे छप्पर कोसळतात आणि समुद्रकिनारे व गच्चीचे तुकडे होतात.
    ५)  वर्ग ५: वारा वेग २५० किमी / तासापेक्षा जास्त - इमारतींचे छप्पर नष्ट होतात, मुसळधार पावसामुळे पूर कोसळतात ज्या किनारश्र्यावरील इमारतींच्या खालच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात आणि रहिवासी क्षेत्र रिकामे करणे आवश्यक असू शकते.
     
    *   विध्वंस वाढत जाणार्‍या चक्रीवादळाच्या अवस्था (चढत्या क्रमाने) -
     
    १)  वार्‍याचा वेग ताशी १७ ते ३० किलोमीटर असल्यास लघुभार किंवा कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर)
    २)  वार्‍याचा वेग ताशी ३१ ते ३९ किलोमीटर असल्यास कमी दाब (डिप्रेशन)
    ३)  वार्‍याचा वेग ताशी ४० ते ५९ किलोमीटर असल्यास खोल कमी दाबाचे क्षेत्र (डिप डिप्रेशन)
    ४)  वार्‍याचा वेग ताशी ६० ते ८९ किलोमीटर असल्यास चक्रीवादळ (सायक्लोनिक स्टॉॅर्म)
    ५)  वार्‍याचा वेग ताशी ९० ते ११९ किलोमीटर असल्यास तीव्र चक्रीवादळ (सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉॅर्म)
    ६)  वार्‍याचा वेग ताशी १२० ते २२० किलोमीटर असल्यास अतितीव्र चक्रीवादळ (एक्स्ट्रिम सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म)
    ७)  वार्‍याचा वेग ताशी २२० किलोमीटरच्या पुढे असल्यास सुपर सायक्लोन
     
    *   चक्रीवादळाची श्रेणी  व होणारे नुकसान -
        (श्रेणी - चक्रीवादळातील वार्‍याचा वेग - संभाव्य नुकसान)
     
    १)  जेव्हा वार्याचा ताशी वेग ९० ते १२४ किलोमीटर इतका असतो, तेव्हा अत्यंत नाममात्र नुकसान होते,
    २)  जेव्हा हा ताशी वेग १२५ ते १६४ किलोमीटर झाल्यास लक्षात येण्याइतपत नुकसान होते,
    ३)  जेव्हा हा ताशी वेग १६५ ते २२४ किलोमीटर असतो तेव्हा घरांचे छप्पर उडते व वीजपुरवठा खंडित होतो
    ४)  वार्याचा वेग जेव्हा ताशी २२५ ते २७९ किलोमीटर असतो तेव्हा मालमत्तेचे नुकसान होते,
    ५)  ताशी २८० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेग असल्यास योग्य काळजी घेतली नाही तर जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.
     
        लँडफॉल म्हणजे काय ?
    *   वादळ अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वार्‍यांचा वेग आणखी वाढतो. चक्रीवादळाचा घेरा शेकडो किलोमीटरपर्यंत पसरतो. पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते २००० हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणार्‍या वार्‍यांचा वेग ताशी २०० किलोमीटरचा टप्पाही ओलांडतो. असे चक्रीवादळ दिवसाला ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत असते. ज्या क्षणाला ते जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळांचा लँडफॉल म्हणतात.
     

    *   चक्रीवादळ निवारण केंद्र -

     

     
    १)  चक्रीवादळ, पुरापासून रक्षण करण्यासाठी किनारी भागात, कोकणातील पहिले सायक्लॉन शेल्टर सैतवडे (ता. रत्नागिरी) येथे आहे.
    २)  ओडीशात २००० पूर्वी चक्रीवादळाने थैमान घातले होते, त्यावेळी केंद्र सरकारने चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये केंद्र उभारली. दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यांचा समावेश झाला.
    ३)  जागतिक बँकेच्या साह्याने नॅशनल सायक्लोन रिस्क मिटींग प्रोजेक्ट (एनसीआरएमपी) अंतर्गत हा कार्यक्रम राबविला जातो. जागतिक बँकेचा ७५, तर २५ टक्के राज्य सरकारचा वाटा आहे..
     

    *   विनाशकारी चक्रीवादळे -

     

     
    १)  भारतीय उपखंडात १९७० पासून १३ विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वार्‍यांचा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा अधिक होता.
    २)  १९७० मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते.
    ३)  २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये १५ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
     

    (५) आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज

     

     
    *   कृत्रिम उपग्रह, डॉप्लर रडार, वेदर स्टेशन यांचे जाळे आणि शास्त्रज्ञांनी त्या निरीक्षणांच्या आधारावर विकसित केलेली अंदाज वर्तवणार्‍या मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाच्या स्वरुपात होणारे बदल, त्याचा समुद्रावरील बदलत जाणारा मार्ग आणि जमिनीवर प्रवेश करताच त्यात होऊ शकणारे बदल आधीच अचूक वर्तवण्यात येतात. यामुळे पूर्वीच्या काळी होणार्‍या नुकसानच्या तुलनेत या तंत्रज्ञानामुळे सद्यस्थितीत नुकसान कमी करता येते.
     

     १)  भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे तीन ते चार दिवस आधीच चक्रीवादळाच्या मार्गाचा अंदाज देण्यात येत असल्यामुळे किनारपट्टीच्या भागात प्रतिबंधक उपाय योजण्यास प्रशासनाला वेळ मिळतो. या अंदाजांमुळेही देशभरातून संबंधित विभागांच्या सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या त्या भागांत रवाना करणे शक्य होते.

     

     
    २)  सागरावर असलेल्या न्यून दाब अथवा न्यूनतर दाब क्षेत्रावर हवामान कार्यालयातील अधिकारी लक्ष ठेवतात. विशेष निरीक्षणांची गरज भासली, तर त्या भागातील जहाजांना व संबंधित किनार्‍यावरील वेधशाळांना विनंती करून दर तासाला हवामान विषयक निरीक्षणे मागवितात. ही निरीक्षणे नकाशावर मांडून त्यांचे विश्‍लेषण केले जाते. अशा प्रकारे दर तासाला केलेल्या विश्‍लेषणाच्या आधारे चक्रीवादळाच्या निर्मितीसंबंधी कळते.
     
    ३)  ढगाचे जागतिक छायाचित्रण कृत्रिम उपग्रहाकडून प्राप्त होते. त्यावरूनही चक्रीवादळ निर्माण झाल्याचे कळू शकते. चक्री वादळाशी संबंधित ढगाचे वलयाकार पट्टे ढगाच्या छायाचित्रात दिसतात.
     
    ४)  ज्या सागरावर जहाजांचे दळणवळण फार कमी आहे त्या सागरावर चक्रीवादळ निर्माण झाले, तर ढगाच्या जागतिक छायाचित्रावरून ते कळू शकते.
     
    ५)  चक्रीवादळ तीव्र होऊन त्याचे हरिकेन किंवा टायफूनमध्ये रूपांतर झाले म्हणजे या छायाचित्रात ढगाचे वलयाकार पट्टे फार स्पष्ट झालेले दिसतात.
     
        चक्रवादळाचा इशारा कधी दिला जातो?

     

     
    *   वार्‍यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात.  वादळातील वार्‍यांच्या वेगानुसार वादळाची तीव्रता निश्‍चित केली जाते. चक्रीवादळातील वारे हे ताशी ९० कि.मी. ते कमाल ताशी २८० कि.मी. या वेगाने वाहतात. तीव्र वादळाचा वेग हा साधारणत: ९० ते ११९ (प्रतितास किमी)असतो. अतितीव्र चक्रीवादळ हे ताशी ११९ ते २२० किलोमीटर वेगाने वाहते, तर ’सुपर सायक्लोन’ वादळे तासाला २२० पेक्षा जास्त वेगाने वाहतात.
     

    १)  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते.

     

    २)  पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनार्‍यावर वाहणार्‍या सोसाटयच्या वार्‍यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वार्‍यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते.
    ३)  या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वार्‍यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.
     
        चक्रीवादळाची चाहूल -
    *   काही पशू, पक्षी आणि प्राण्याच्या संवेदना अधिक तीक्ष्ण असतात. त्यांना निसर्गात होणार्‍या बदलांची चाहूल खूप आधी लागते.
     
    १)  पक्ष्यांना चक्रीवादळाची चाहूल एखादे वादळ सुमारे ९०० किमी अंतरावर असतानाच लागत असल्याचे अमेरिकी संशोधकांना आढळले आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये या संदर्भातील पुरावे मिळाले आहेत.
     
    २)  भूकंपाची चाहूल कुत्र्यांना प्रत्यक्ष भूभागाला धक्का बसण्यापूर्वी ५ मिनिटे आधी होते.
      

    (६) भारतीय उपखंडातील चक्रीवादळे

     

     
    *   जगात नोंदविण्यात आलेल्या ३५ सर्वात विध्वंसक चक्रीवादळांपैकी २६ चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहेत. गेल्या दोन दशकांत चक्रीवादळाशी संबंधित मृत्युंपैकीमध्ये ४२ % मृत्यू एकट्या बांगलादेशात झाले आहेत. त्यात भारताचा वाटा २७ % आहे.
     
    *   १९९८ ते २००१ या कालावधीत तीन चक्रीवादळं भारतीय उपखंडात आली होती आणि त्यात १७,००० जणांचा जीव गेला होता. त्यानंतरच्या वीस वर्षांत (२००१-२०२१) हवामान विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे मोठी वादळं येऊनही तुलनेनं नुकासन कमी होताना दिसतं. पण थेट मुंबईला एखादं वादळ येऊन धडकलं, तर मोठं नुकसान होण्याची भीती कायम आहे.

     

        बंगालच्या उपसागरात सर्वाधिक वादळे का?

     

     
    *   भारताच्या दोन्ही बाजूंनी समुद्र असूनही सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरातूनच जन्माला येतात. याचे कारण लपले आहे दोन्ही समुद्रांच्या तापमानात. बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सूनआधी आणि मान्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत उबदार असते. त्यामुळे पावसाआधी किंवा नंतर खास करून ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यातही वैशष्टि्यपूर्ण बाब म्हणजे भौगोलकि रचना. बंगालच्या उपसागरातून येणार्‍या वार्‍याला पूर्व भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीोन असल्याने वार्‍यांना कमी जागा मिळते. त्यामुळेच ते अधकि विध्वंसक बनतात. याच्या उलट अरबी समुद्रात येणार्‍या चक्रीवादळाला आजूबाजूला केवळ समुद्र असल्याने ते लवकर विरते.
     
    १)  भौगोलिक रचनेमुळे बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सूनपूर्वी आणि मान्सूननंतरही ऊबदार असते. त्यामुळे या काळात चक्रीवादळांसाठी पोषक वातावरण मिळते.
     
    २)  पूर्व भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीन आहे, त्यामुळे वार्‍यांना कमी जागा मिळते आणि ते विध्वसंक बनतात.
     
    ३)  अरबी समुद्रातील चक्रीवादळाला चोहोबाजूला समुद्र असल्याने ते लवकर विरते.
     
    ४)  बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळ यांतील गुणोत्तर ४ : १ आहे.
     
    ५)  आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक तीव्रतेच्या चक्रीवादळातील सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरात तयार झाली आहेत.
     

    *   बंगालच्या उपसागरातील भीषण चक्रीवादळे -

     

     
    १)  ग्रेट बोहा सायक्लोन, बांगलादेश (१९७०) : तीन ते पाच लाख जण मृत्यमुखी
    २)  हुगळी रिव्हर सायक्लोन, भारत आणि बांगलादेश (१७३७) : तीन लाख मृत्युमुखी
    ३)  कोरिंगा, भारत (१८३९) : तीन लाख मृत्युमुखी
    ४)  बेकरगंज सायक्लोन, बांगलादेश (१८७६) : दोन लाख मृत्युमुखी
    ५)  ग्रेट बेकरगंज सायक्लोन, बांगलादेश (१८९७) : दोन लाख मृत्युमुखी
     

        परादीपचे चक्रीवादळ -

     

     
    *   १९९९ मध्ये भारतातील ओडीसा हे राज्य सर्वात विध्वंसक चक्रीवादळाला सामोरे गेले. या वादळाला १९९९ चे चक्रीवादळ किंवा ‘सायक्लोन ०५-बी’ किंवा ‘परादीपचे चक्रीवादळ’ असेही संबोधण्यात येते. भारतीय हवामानखात्याच्या परिभाषेत हे ‘सुपर सायक्लोनिक स्टॉर्म’ होते. २५ ऑक्टोबर १९९९ ला मलय द्वीपकल्पाच्या आसपास तयार झालेले हे चक्रीवादळ २९ ऑक्टोबरला भुवनेश्‍वरजवळ धडकले. सरकारी नोंदींनुसार या चक्रीवादळात आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसात सुमारे १० हजार व्यक्तींनी प्राण गमावला होता. 
     
        ग्रेट बॉम्बे सायक्लोन -
     
    *   अरबी समुद्रात १८८२ मध्ये निर्माण झालेल्या ग्रेट बॉम्बे सायक्लोनमुळे सर्वाधिक विध्वंस झाला होता. या वादळात सुमारे एक लाख नागरिकांना जीव गमवावा लागला होता, असे समजते.  जगात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या ३५ सर्वात विध्वंसक चक्रीवादळांपैकी २६ चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झालेली होती.  दोन दशकांत चक्रीवादळाशी संबंधित मृत्युंपैकीमध्ये ४२ टक्के मृत्यू एकट्या बांगलादेशात झाले आहेत. त्यात भारताचा वाटा २७ टक्के आहे.
     

    *   मुंबईला धडकलेली वादळे -

     

     
    १)  मुंबई लगतच्या कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची घटना दुर्मिळ मानली जाते.
    २)  १९६८ चे चक्रीवादळ हर्णै येथे, तर २००९ मध्ये फियान चक्रीवादळ अलिबाग आणि मुंबई यांच्या दरम्यान किनारपट्टीला धडकले होते.
    ३)  २०२० चे निसर्ग व २०२१ चे तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले होते.
     

    *   १८९१ ते २००२ च्या कालावधीत भारतातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आलेले चक्रीवादळ खालीलप्रमाणे आहेत. (कंसात वादळांची संख्या)

     

     
    *   पश्‍चिम किनारपट्टी   -
     
    १)  केरळ (३)- मलप्पुरम, कन्नूर, कोझिकोड वादळ संख्या प्रत्येकी १
    २)  कर्नाटक (२) - दक्षिण कन्नड,उत्तर कन्नड प्रत्येकी १
    ३)  महाराष्ट्र (१३) - सिंधुदुर्ग (३), रत्नागिरी (३),ठाणे (४),मुंबई (३)
    ४)  गोवा (२) - गोवा (२)
    ५)  गुजरात (२८)- सुरत (१) कैरा (१) भावनगर (४) अमरेली (४) जुनागढ (७) जामनगर (६) कच्छ (५)
     
    *   पूर्व किनारपट्टी -
     
    १)  पश्‍चिम बंगाल (६९) - २४ परगणा (उत्तर आणि दक्षिण). (३५) मिदनापूर(३४)
    २)  ओडिसा (९८) - कटक (३२) पुरी (१९) गंजम(१५)
    ३)  आंध्र प्रदेश (७९) - श्रीकाकुलम (१४) विशाखापट्टणम (९) पूर्व गोदावरी (८) पश्‍चिम गोदावरी (५) कृष्णा (१५) गुंटूर (५) प्रकाशम (७) नेल्लोर (१६)
    ४)  तामिळनाडू (५४)- चेन्नई (१८) कुडलोर (७) साउथारकोट (५) तंजावर (१२) पुडुकोकोटल (५) रामनाथपुरम (३) तिरुनेलवेली (२) कन्याकुमारी (२)    
    ५)  पांडिचेरी (८) - पांडिचेरी (८)
      

    भारतातील काही विध्वंसक चक्रीवादळे

     

     
    *   राज्य व वर्ष - नुकसान
     
    १)  प. बंगाल १८४७ - ७५,००० लोक आणि ६,००० जनावरे मृत्युमुखी. दळणवळण विस्कळीत व वित्तहानी
    २)  प. बंगाल १८७४ - ८०,००० लोक मृत्युमुखी. मोठ्या प्रमाणात  दळणवळण विस्कळीत व वित्तहानी
    ३)  आंध्रप्रदेश १९४६ - ७५० लोक रपव ३०,००० जनावरे मृत्युमुखी. वित्तहानी व रस्त्याचे नुकसान
    ४)  तामिळनाडू १९७२ - ८० लोक आणि १५० जनावरे मृत्युमुखी दळणवळण विस्कळीत.
    ५)  प. बंगाल १९७६ - १० लोक आणि ४०,००० जनावरे मृत्युमुखी, वित्तहानी व रस्त्याचे नुकसान
    ६)  आंध्रप्रदेश १९७७ - ८५४७ लोक आणि  ४०,००० जनावरे मृत्युमुखी. वित्तहानी, दळणवळण विस्कळीत
    ७)  तामिळनाडू १९७९ - ७०० लोक आणि  ३,००,००० जनावरे मृत्युमुखी.  दळणवळण विस्कळीत
    ८)  ओडिशा १९८५ - ८४ लोक आणि २,६०० जनावरे मृत्युमुखी,जमिनीचे नुकसान
    ९)  आंध्रप्रदेश १९८७ - ५० लोक आणि २५,८०० जनावरे मृत्युमुखी, रस्ते आणि दळणवळण विस्कळीत
    १०) ओरिसा १९८९ - ६१ लोक आणि  २७,००० जनावरे मृत्युमुखी, १. ४५ लाख घरे नष्ट
    ११) आंध्रप्रदेश १९९० - ९२८ लोक मृत्युमुखी, १४,००० घरे नष्ट.
    १२) तामिळनाडू १९९१ - १८५ लोक आणि ५४० जनावरे मृत्युमुखी ,रस्ते व वित्तहानी
    १३) प. बंगाल १९९३ - १०० च्यावर मृत्युमुखी, वित्तहानी, दळणवळण विस्कळीत
    १४) प. बंगाल १९९४ - २६ गावातील एक हजारावर घरे नष्ट, तलाव नष्ट झाल्याने मासेमारी प्रभावित
    १५) आंध्रप्रदेश १९९६ - १,०५७ मृत्युमुखी, ६४७,००० घरे नष्ट, दळणवळण प्रभावित
    १६) गुजरात१ ९९८ - १,२६१ नागरिक जखमी, २.५७  घराचे नुकसान
    १७) ओडिशा १९९९ - १०,०८६ नागरिक जखमी, २१.६ घराचे नुकसान
     

    आशियाखंडातील सर्वात विध्वंसकारी १० चक्रीवादळे

     

     
    १) ग्रेट बोहा चक्रीवादळ, बांगलादेश वर्ष १९७०. मृत्यूची संख्या : अंदाजे ५,५०,०००.
    २) हुगली नदी चक्रीवादळ, भारत आणि बांगलादेश, वर्ष १७३७. मृत्यूची संख्या : ३,५०,०००.
    ३) हैफोंग टायफून, व्हिएतनाम, वर्ष १८८१. मृत्यूची संख्या : ३,००,०००.
    ४) कोरींगा चक्रीवादळ, भारत, वर्ष १८३९ मृत्यूची संख्या : ३,००,०००.
    ५) बॅकरगंज चक्रीवादळ, बांगलादेश, वर्ष १८५४. मृत्यूची संख्या : २,००,०००.
    ६) ग्रेट बॅकरगंज चक्रीवादळ, बांगलादेश, वर्ष १८७६ मृत्यूची संख्या : २,००,०००.
    ७) चटगांव चक्रीवादळ, बांगलादेश, वर्ष १८९७. मृत्यूची संख्या : १,७५,०००.
    ८) सुपर टायफून नीना, चीन, वर्ष १९७५. मृत्यूची संख्या : १,७१,०००.
    ९) चक्रीवादळ ०२-बी, बांगलादेश, वर्ष १९९१ मृत्यूची संख्या : १,४०,०००.
    १०) ग्रेट बॉम्बे चक्रवात, भारत, वर्ष १८८२. मृत्यूची संख्या : १,००,०००.
    ११) नर्गिस - मे २००८ मध्ये आलेले नर्गिस हे चक्रीवादळ अत्यंत विनाशकारी आणि प्राणघातक म्हणून म्यानमारच्या इतिहासामध्ये  नोंदविले गेले. २ मे २००८ रोजी म्यानमारमध्ये या चक्रीवादळाने ४० किलोमीटर किनार्‍यावर  धडक दिली. या दुर्घटनेमुळे १, ३८,३७३ लोकांचा मृत्यू झाला
     
    दरवर्षी सर्वाधिक वादळाचा धोका असलेले देश

     

     
    *   इतर देशांच्या तुलनेत खालील देशांना वादळांचा सर्वात जास्त संख्येने सामना करावा लागतो.
    १)  चीन,
    २)  फिलीपिन्स,
    ३)  जपान,
    ४)  मेक्सिको,
    ५)  अमेरिका, युनायटेड स्टेट्स (हवाईसह),
    ६)  ऑस्ट्रेलिया,
    ७)  व्हिएतनाम,
    ८)  मेडागास्कर,
    ९)  क्यूबा
      

Share this story

Total Shares : 6 Total Views : 5865