रामभाऊ म्हाळगी : लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श

  • रामभाऊ म्हाळगी : लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श

    रामभाऊ म्हाळगी : लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श

    • 15 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 12 Views
    • 0 Shares
    रामभाऊ म्हाळगी : लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श
     
    *   रामभाऊ म्हाळगी हे एक कुशल संसदपटु, आदर्श लोकप्रतिनिधी आणि अत्यंत तळमळीचे सार्वजनिक कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रास सुपरिचित होते. लोकसभेतील आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडणारी, आपल्या कार्याने, जनसंपर्काने व वक्तृत्वाने स्वतःचे असे आगळे स्थान निर्माण करणारी महाराष्ट्राची परंपरा आहे. स. गो. बर्वे, बॅ. नाथ पै, बापूसाहेब काळदाते, मधु दंडवते, उत्तमराव पाटील आदिंनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा प्रभाव लोकसभेत पाडला. रामभाऊ म्हाळगी याच परंपरेचा एक भाग होते. ते १९५७, १९६७, १९७२ असे तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेत आमदार, तर १९७७, १९८० असे दोन वेळा ठाणे मतदार संघातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
     
    *   रामभाऊ म्हाळगींचा जन्म पुणे जिल्ह्यातील कुडूस गावचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. रामभाऊ विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. मद्रास व सोलापूर येथे त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले. म्हाळगी यांना सार्वजनिक जीवनाचे बाळकडू ऐन तारुण्यातच मिळाले. महाविद्यालयीन जीवनात असतानाच त्यांची स. प. महाविद्यालयात पी. टी. ऑर्गनायझर, लॉ कॉलेजमध्ये वादविवाद मंडळ व नियतकालिकाचे सचिव म्हणून निवड झाली होती. येथूनच त्यांच्या सार्वजनिक जीवनाला एका अर्थाने प्रारंभ झाला. पुढे गोवा विमोचन समितीच्या कार्यकारी समितीचे सचिव, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जनरल कौन्सिलचे सदस्य, महाराष्ट्र दुष्काळ निवारण (सर्वपक्षीय) समितीच्या जनरल कौन्सिलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. याच बरोबर मध्य रेल्वे स्टेशन मास्टर्स संघटनेचे उपाध्यक्ष, पुणे बार कौन्सिलचे उपाध्यक्ष आदी पदांवरील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
     
    *   सन १९५२-५३ च्या सुमारास ते राजकीय क्षेत्रात आले. भारतीय जनसंघाच्या संघटन कार्याची प्रथम त्यांच्यावर जबाबदारी पडली. पक्षाची बांधेसूद बांधणी करून त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात त्यासाठी त्यांनी प्रवास केला आणि त्यांनी पक्षाला ’आकार’ आणला.
    *   १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर निवडणुका लढविल्या गेल्या. त्या वेळी जनसंघाने संयुक्त महाराष्ट्र समितीशी समझौता केला. त्यानंतर जागांचे जे वाटप झाले त्यात म्हाळगी हे पुणे जिल्ह्यातील वडगाव (मावळ) भागातून निवडून आले. महाराष्ट्रात जनसंघाचे निवडून आलेले ते पहिले आमदार होते. त्या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षात एस. एम. जोशी, आचार्य अत्रे असे दिग्गज नेते होते. असे असतानाही दत्ता ताम्हणे, नवनीत शहा आणि ज्या दोन-तीन अन्य नवोदित आमदारांनी विधानसभेत आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविली, त्यात म्हाळगींचा समावेश होता.
     
    *   त्यांच्या लोकप्रियतेचा आधार त्यांचा व्यवस्थितपणा, शिस्तबद्धता, तत्परता, जागरुकता, कष्टाळूपणा आणि अभ्यास हा आहे. सामान्यतः राजकारणी माणूस या रीतीने लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण हा लोकप्रियतेचा राजमार्ग नाही; पण रामभाऊंनी मात्र हाच खडतर मार्ग निवडला आणि त्या मार्गाने लोकप्रियता मिळविली यातच त्यांचे असामान्यत्व आहे. रामभाऊंची कार्यपद्धती व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कामगिरी आणि व्यवहार वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा एक खास ठसा उमटविला. राजकीय नेता म्हटला तर अव्यवस्थित, अनियमित, वेळ न पाळणारा, प्रसिद्धीची हाव असलेला चिठ्ठ्या-चपाट्यांचे राजकारण करणारा, वावदूक, अभ्यासू वृत्तीचा अभाव असणारा अशी सर्वसामान्यपणे छबी बनलेली असते. मात्र, राजकीय पुढार्‍याच्या या रुढ प्रतिमेस रामभाऊंनी छेद दिला.
     
    *   व्यवसाय व राजकीय जीवन याच्यात रामभाऊंनी जसा समतोल साधला, तसाच तो त्यांनी आपल्या राजकीय व संसारिक जीवनांतही साधून राजकीय जीवनात एक वैशिष्टयपूर्ण आदर्श निर्माण केला. त्यांच सार्वजनिक जीवन आरशासारखे स्वच्छ व पारदर्शक होत. तिथे कायम बेरीजच होती, वजाबाकी नाही. गुणांचा गुणाकार होता, पण भाग्याचा भागाकार नाही. ’कंटाळा’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांचे जीवन म्हणजे आखीव व रेखीव आणि नियोजनबद्ध. त्यासाठी अविश्रांत धडपड, पत्रलेखन, प्रवास, भेटीगाठी व निरनिराळ्या कार्यक्रमाची आखणी, अदम्य उत्साहाने हे सर्व चालू असायचे. मतदार संघातील मतदारांशी त्यांच्या जिवंत संपर्क असायचा. लोकप्रतिनिधी हा मतदारांना नेहमी उत्तरदायी असला पाहिजे, अशी त्यांची भूमिका असे. याच भूमिकेतून त्यांनी आपल्या वार्षिक कामाचा अहवाल मतदारांना देण्याची अभिनव पद्धती सुरू केली. भारतीय राजकारणातील हे एक पथदर्शी उदाहरण आहे.
     
    *   रामभाऊंच्या संसदपटुत्वाचे असे अनेक पैलू सांगता येतील. मात्र, लोकप्रतिनिधीचा खरा कस लागतो त्याच्या सभागृहातील कामगिरीबद्दल. त्यांच्या या कामगिरीचा कोणी आलेख काढला असता तर रामभाऊंना शत-प्रतिशत गुण मिळाले असते. कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या नियमाचा किंवा आयुधाचा वापर करावयाचा हे अचूकपणे जो सभासद जाणतो तोच खरा संसदपटु असतो. प्रश्नोत्तराचा तास, अर्धा तास चर्चा, लक्षवेधी प्रस्ताव, तातडीची चर्चा, अशासकीय प्रस्ताव, कपात सूचना, राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावास दुरुस्ती सूचना, अशी अनेक आयुधे लोकप्रतिनिधीस वापरता येतात. याशिवाय विनंती अर्ज, अविश्वासाचा ठराव, हक्कभंग सूचना वगैरे अनेक प्रकाराने सभागृहाच्या व्यासपीठाचा वापर करता येतो. रामभाऊंनी विधानसभा व लोकसभेतील आपल्या कारकीर्दीत यापैकी प्रत्येक आयुधाचा प्रभावीपणे उपयोग केला. महाराष्ट्राच्या विधानसभेत, एका वर्षात दीडहजारापेक्षा जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रमही रामभाऊंच्याच नावावर आहे.
     
    *   रामभाऊंचे वक्तृत्व मोठे परिणामकारक व आकर्षक होते. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. यामुळे त्यांच्या भाषणांत इंग्रजी शब्द क्वचितच आढळत. मुद्द्यांची पुनरावृत्ती त्यांच्या भाषणात सहसा होत नसे. जेवढे आवश्यक आहे तेवढेच मांडण्याची त्यांची हातोटी होती. सुसंस्कृत भाषेत, विरोधकांना न दुखवता त्यांच्यावर प्रहार करण्याची अद्भुत कला रामभाऊंकडे होती. रामभाऊंची कांही भाषणे त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना आजही वाचनीय आहेत. सीमाप्रश्न, कूळ कायदा, जिल्हा परिषद कायदा, शेतजमिनीच्या कमाल धारणेबद्दलचा कायदा या विषयांवरील त्यांच्या भाषणांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.
     
    *   आमदार या नात्याने सुमारे १५ वर्षे, तर खासदार या नात्याने पाच वर्षे त्यांनी जी मूल्यांची जपणूक केली त्याला तोड नाही. विरोधी पक्षात राहून सरकारला धारेवर धरणारा लोकप्रतिनिधी आणि गोरगरीब व अडचणीत सापडलेल्यांना एक आधार अशी त्यांनी स्वत:ची एक प्रतिमा उभी केली. प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे यांनी ’म्हाळगींच्या कामात तत्त्वांची ठिणगी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो असे म्हटले होते. बाळासाहेब भारदे यांना त्यांच्या लोकप्रतिनिधित्वातील ’धी’ मोलाचा वाटला. दत्ताजी ताम्हाणे यांनी ’रामभाऊ अ‍ॅज ए लेजिसलेटर’हे शंभर पानी पुस्तक लिहून काढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
     
    *   आज सर्वत्र राजकीय मूल्यांची घसरण होत असताना रामभाऊंचे समर्पित व समतोल जीवन अनेकांना स्फूर्ती देणारे आहे. रामभाऊंनी आपल्या आमदार व खासदारकीच्या काळात ’लोकप्रतिनिधी’ या संस्थेस मोठे केले. राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी स्वतः नेतृत्व प्रशिक्षण घेतले पाहिजे आणि जनतेससुद्धा राजकीय शिक्षण दिले पाहिजे असे ते नेहमी म्हणत. सन १९८० मध्ये इंदिराजींच्या लाटेतही ठाणे लोकसभा मतदार संघातून ते दुसर्‍यांदा निवडून आले होते, हे उल्लेखनीय आहे. पुढे सक्रिय राजकारणातून संन्यास घेऊन राजकीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घडवून आणणार्‍या संस्थेच्या निर्मितीस वाहून घेण्याचा मनोदय रामभाऊंनी व्यक्त केला होता. मात्र, १९८२ मध्ये नियतीने त्यांना अवचितपणे ओढून नेले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्थापन झालेली. ’
     
    *   रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ ही संस्था रामभाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करीत आहे. रामभाऊंना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन !
     
    सौजन्य व आभार :  दैनिक लोकसत्ता
    ६ जुलै  २०२१ /  रवींद्र माधव साठे
    (लेखक ’रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे महासंचालक आहेत)

Share this story

Total Shares : 0 Total Views : 12