आपण कुठल्या बाजूचे ?

  •  आपण कुठल्या बाजूचे ?

    आपण कुठल्या बाजूचे ?

    • 12 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 18 Views
    • 0 Shares
     आपण कुठल्या बाजूचे ?
     
    *   कोणताही वैज्ञानिक आधार नसणार्‍या फलज्योतिष या विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा मनसुबा धक्कादायक आहे. एकीकडे जग मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहात असताना ग्रह, उपग्रह आणि तारे यांचे कडबोळे करून भविष्याचा फसवा वेध घेण्याच्या वृत्तीला सरकारनेच खतपाणी घालावे, हे उचित नाही...
     
    *   इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने(इग्नू) यंदापासून ज्योतिष विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे. एका बाजूला मंगळाच्या कक्षेत यान पाठवणार्‍या आपल्या देशात ज्योतिषपदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न ही काही नवीन गोष्ट नाही. २००१ साली वाजपेयी सरकारनेही असा निर्णय घेतला होता. तो मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर मागे घेण्यात आला. आता परत नव्या जोमाने हे प्रयत्न सुरू झाले आहेत. या निमित्ताने ज्योतिष आणि खगोलशास्त्र यातील मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. तसेच, महाराष्ट्र
     
    *   अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय खगोल विज्ञान संस्था या ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी का करत आहेत, हेही समजून घ्यावे लागेल.
     
    *   इग्नूच्या अभ्यासक्रमात काय आहे, हे एक नजर टाकली तरी कळेल. या अभ्यासक्रमातील अशास्त्रीयता पण लक्षात येईल. या अभ्यासात पंचांग, मुहूर्त, कुंडली निर्माण, फलविचार, ग्रहणवेध असे विषय दिले आहेत. एखाद्या गोष्टीला वैज्ञानिक आधार तपासण्यासाठी त्यामधील काही मूलभूत गृहीतके तपासणी होऊन सिद्ध झालेली असावी लागतात. ज्योतिषामधील जी प्रमुख तीन गृहीतके समजली जातात; त्यावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. ती आधी समजून घेवू आणि मग तपासून बघू. यात पहिले गृहीतक असे आहे की, आकाशातील ग्रहगोलांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो. दुसरे गृहीतक असे की, हा परिणाम त्या व्यक्तीच्या जन्मवेळेवर अवलंबून असतो आणि तिसरे गृहीतक असे की या सगळ्यावरून माणसाचे भविष्य ठरते आणि ते बदलतादेखील येते.
     
    *   आता या गृहीतकांवरचे प्रमुख आक्षेप पाहू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, ज्या नवग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो, असे ज्योतिषामध्ये मानले जाते, त्यामधील सूर्य हा ग्रह नसून तारा आहे आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. राहू आणि केतू हे सगळ्यात खतरनाक मानले जाणारे ग्रह हे खगोलशास्त्राच्या दृष्टीने ग्रह नसून ते पृथ्वी आणि चंद्राच्या भ्रमणकक्षांशी संबंधित छेदनबिंदू आहेत. जी नक्षत्रे ज्योतिषामध्ये मानली जातात, प्रत्यक्ष वैज्ञानिक सिद्धतेतून आपल्या लक्षात आले आहे की नक्षत्रे आणि ग्रहांमध्ये हजारो अब्ज मैल एवढी पोकळी आहे. ज्या आकाशगंगेत आपला सूर्य आणि सूर्यकुल येते त्या आकाशगंगेत सूर्यापेक्षा प्रभावी असे असंख्य तारे आहेत. ज्या गोष्टींच्या मूळ गृहीतकांमध्ये इतके गोंधळ आहेत, त्यातून पुढे कोणतीही सिद्धता होणे किती अशक्य आहे, हे आपल्याला सहज लक्षात येते. दुसरी गोष्ट जन्माच्या वेळेसंबंधी. अगदी साधी गोष्ट म्हणजे ही जन्माची वेळ म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येते, ती समजली जाते. पण प्रत्यक्षात आधुनिक विज्ञान आपल्याला हे सांगते की जेव्हा पुरूषबीज आणि स्त्रीबीज एकत्र येऊन बाळाचे बीज तयार होते, तेव्हाच प्रत्यक्षात बाळाचा जन्म झाला असतो आणि त्यापुढील नऊ महिने त्याची वाढ होते. मग या काळात ग्रहगोलतारे त्यावर काही परिणाम करीत नाहीत, हे कसे? याचे कोणतेही तर्कसंगत उत्तर ज्योतिष या कथित विद्येकडे नाही. प्रत्येक सेकंदाला जगात हजारो मुले जन्माला येतात आणि त्यांचे भविष्य एकसारखे नसते, हे तर अगदी साधे निरीक्षण आहे. उद्या मानव चंद्रावर किंवा मंगळवारही बाळ जन्माला घालू शकेल. तेव्हा त्यांच्या कुंडलीत काय असेल? यासारखे अनेक प्रश्‍न विचारता येऊ शकतात. यामधील सगळ्यात गंभीर बाब अशी की, या भविष्यावरती आपले सगळे आयुष्य निर्भर आहे आणि काही पूजा-अर्चा-ग्रह-शांती करून ते भविष्यातील प्रश्‍न सुटू शकतात, ही जी दैववादी मांडणी आहे, ती विज्ञान सांगत असलेल्या प्रयत्नवादाच्या पूर्णपणे विरोधी आहे.
     
    *   या पार्श्‍वभूमीवरील प्रत्येक लढाई मुहूर्तावर सुरू करणारी पेशवाई बुडाली आणि अजिबात मुहूर्त न पाहणारे इंग्रज जिंकले. हे कसे काय? हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला रोकडा सवाल लक्षात घेतला पाहिजे. राजर्षि शाहू महाराजांनी त्यांचे भविष्य सांगायला आलेल्या एका ज्योतिषाला अचानक एक दिवस तुरुंगवास घडवून कशी समज दिली, ती गोष्ट जगजाहीर आहे. हे सगळे समजून घ्यायला खरे तर फार शिक्षित असण्याचीही गरज नाही. बहिणाबाई चौधरी यांची कविता काय सांगते, ते पाहा. ’नको नको रे ज्योतिषा, माह्या दारी नको येवू, माह्य दैव मले कळे, माह्या हात नको पाहू’ हे आपण समजून घेतले पाहिजे.
     
    *   जयंत नारळीकर यांच्यापासून अनेक खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. वैज्ञानिक जेम्स रयान्डी यांनी जगाच्या अंताविषयी केल्या गेलेल्या ४५ दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच, भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही. वेन्कटरामन यांनीही ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे.
     
    *   इग्नूच्या अभ्यासक्रमात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोलशास्त्रीय घटनाच्या विषयी अज्ञान आणि भीती पसरवण्याचे काम केले जात आहे. ग्रहणाच्या कालखंडात नीट आहार न घेतल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली असताना अशा गैरसमजाना बळकटी देणार्‍या अवैज्ञानिक गोष्टी हा लोकांच्या जिवाशी खेळ आहे, हे देखील आपण समजून घेतले पाहिजे. आपण जेव्हा ज्योतिषाच्या वाटेने चाललो आहोत, त्यावेळी अमेरिकेतील उद्योगपती इलोन मस्क यांनी स्पेस-एक्स या मोहिमेतून मंगळ या ग्रहावर मानवी वस्ती करण्याचासाठीचा प्रकल्प सुरू केला आहे. ’नासा’ने मंगळ ग्रहावर पाठवलेले रोव्हर तसेच रोबो तिथली माहिती गोळा करत आहेत. स्टीफन हॉकिंगसारखा शास्त्रज्ञ हा त्याच्या शेवटच्या पुस्तकात म्हणतो की, ’पृथ्वीसारख्या माणसाला राहता येणार्‍या ग्रहाचा शोध विश्‍वमालेत घेणे’ हा आपल्या खगोल संशोधनाचा प्राधान्यक्रम असायला पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर खगोलाचे विज्ञान हे समाजापर्यंत नेण्याऐवजी ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करून आपण उलट्या दिशेने प्रवास करत नाही ना, असा प्रश्‍न पडतो.
     
    *   एकीकडे सार्‍या जगाला ग्रासलेल्या करोनाच्या साथीमुळे विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित होत असताना अशा स्वरूपाच्या अशास्त्रीय गोष्टींना उत्तेजन देणे सरकारने टाळायला हवे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सार्‍यांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍या आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात ’छद्म विज्ञान विरोधी जनजागृती’साठी राखीव निधी ठेवणार्‍या महाराष्ट्र सरकारने अशा स्वरूपाच्या अवैज्ञानिक गोष्टींची अंमलबजावणी निदान महाराष्ट्रापुरती तातडीने थांबवावी, अशी अपेक्षा आहे. पण जोपर्यंत शासन हे करत नाही, तोपर्यंत आपण कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या फलज्योतिषाच्या मागे लागायचे की खर्‍या अर्थाने मानवी भविष्याची आशा असलेले खगोल विज्ञान अभ्यासायचे, हे आपण ठरवणे आवश्यक आहे.
     
    सौजन्य व आभार :  महाराष्ट्र टाइम्स
    ४ जुलै  २०२१ / डॉ. हमीद दाभोलकर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 18