हिमंता बिस्वा सरमा

  •  हिमंता बिस्वा सरमा

    हिमंता बिस्वा सरमा

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 64 Views
    • 0 Shares
     हिमंता बिस्वा सरमा

         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भारतीय राजकारण या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी भारतीय राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, उपयोजित माहिती, मुद्दे, घटक, प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (2) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : 7. पक्ष आणि हितसंबंधी गट  -
     
      भारतीय पक्ष पध्दती भारतीय पक्ष पध्दतीचे बदलते स्वरूप. राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष - विचारप्रणाली, संघटन, पक्षीय निधी, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधार, महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबधी गट.
     
      (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    आसामचे नवे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा
     
       पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी 2014 पासून देशभर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आयात केले. त्यांना मंत्रिपदंही दिली. पण मुख्यमंत्रिपद दिले नव्हते. आता मात्र काँग्रेमधून भाजपमध्ये येऊन अवघ्या सहा वर्षांत मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा चमत्कार हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. 2021 मध्ये झालेल्या आसामच्या विधानसभा निवडणुकीत दुसर्यांदा भाजप आघाडीला बहुमत मिळाले. त्यानंतर सरमा यांच्या शिरावर मुख्यमंत्रिपदाचा मुकुट ठेवला गेला आहे. आधीचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे लोकप्रिय होते. सीएसडीएस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणांमध्ये सोनोवाल यांची सरमा यांच्यापेक्षा दुपटीने अधिक लोकप्रियता दिसली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही त्यांना पाठबळ होते. परंतु शेवटी मुख्यमंत्रिपदाची माळ मात्र 52 वर्षीय सरमा यांच्याच गळ्यात पडली. ते विजय रूपानी किंवा मनोहरलाल खट्टर यांच्यासारखे अंगठ्याखाली राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत म्हणून ही निवड झाली नाही, तर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नव्हता हे खरे कारण आहे.
     
       गेल्या 6 वर्षांत सरमा यांनी आसामच नव्हे तर ईशान्य भारतातील सर्व राज्यांत भाजपला जे राजकीय यश मिळवून दिले आहे ते पाहिल्यावर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय का नव्हता याचा उलगडा होतो. सरमा म्हणजे उत्तम संघटन कौशल्य असणारा नेता. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला तिसर्‍यांदा सत्ता मिळाली. त्यामध्ये सरमा यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे तरुण गोगोई यांना हटवून आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्याइतपत त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. बंड करून 2015 मध्ये भाजपमध्ये आले ते काँग्रेसला मोठे भगदाड पाडूनत्यामुळे 2016 मध्ये भाजपला आसाममध्ये केवळ मोदींच्या करिष्म्यावर विजय मिळाला नसता. त्याला सरमा यांच्या संघटनात्मक ताकदीची आणि त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेची जोड होती. हा ईशान्य भारतात भाजपला मिळालेला पहिला विजय होता, म्हणून भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा. सरमांचे राजकीय कौशल्य पाहून त्यांना ईशान्य लोकशाही आघाडी’ (नेडा) या ईशान्य भारतातील भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीचे संयोजकपद देण्यात आले. त्यानिमित्ताने सरमा यांनी संपूर्ण ईशान्य भारतावर आपला ठसा उमटवला. ‘काँग्रेसमुक्त भारताचेभाजपचे स्वप्न ईशान्य भारतात त्यांनी पूर्ण केले. त्यासाठी अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार त्यांनी ऑपरेशन कमळकरून पाडले. मणिपूरमध्ये निवडणुकीत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या असतानाही काँग्रेसला सरकार स्थापन करू दिले नाही. आज ईशान्य भारतात आठही राज्ये भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. अशा सत्तासुखाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी. या यशाचे सूत्रधार हिमंता बिस्वा सरमा हेच आहेत!
     
       2019 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य भारतातील 24 पैकी 17 जागा भाजपला मिळाल्या. निवडणुकीच्या काही काळ आधी सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाची ठिणगी सर्वप्रथम आसाममध्येच पडली होती. त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसेल का अशी शंका होती. परंतु हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यावर मात केली. या निवडणुकीत त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून निर्माण झालेले पक्ष रिंगणात असतानाही त्याचा फटका भाजपला बसला नाही. याचे श्रेय सरमा यांच्या रणनीतीला जाते.
     
       याशिवाय विचारधारेची लवचिकता सरमा यांनी कायम ठेवली आहे. त्यांची राजकीय सुरुवात आसूया विद्यार्थी संघटनेपासून झाली. ही संघटना 1980 च्या दशकातली आसामी अस्मितेच्या आंदोलनात मध्यवर्ती होती. याच आंदोलनातून असोम गण परिषदहा पक्ष उदयास आला. पण सरमांनी मात्र काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर भाजपची विचारधारा त्यांनी इतकी सहजगत्या अवगत केली की, 2014 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या गुजरात मॉडेलची सभांमधून निर्भर्त्सना करणारे हिमंता बिस्वा सरमा, धार्मिक ध्रुवीकरणाचा मंत्र कैक वर्षे भाजपमध्ये काढलेल्या नेत्यांपेक्षा अधिक निष्ठेने वापरू लागले. आसामी अस्मितेचे राजकारण हे बंगाली भाषिक हिंदू तसेच मुस्लिमविरोधी आहे. याला छेद देत सरमा केवळ मुस्लिम विरोध करतात. कारण तेच भाजपच्या राजकारणाला अनुकूल आहे. त्यामुळे साखर दुधात जितक्या सहजपणे विरघळते तितक्याच सहजपणे ते संघ-भाजपचे भाग आहेत. संघ शाखेत प्रशिक्षण घेतलेले नसताही सरमा अव्वल दर्जाचे प्रचारकझाले आहेत. शिवाय काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्रिपदासाठी बंड करणारा नेता, त्याच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत तर भाजपमध्ये दीर्घकाळ शांत राहणार नाही, हे स्वतः पराकोटीचे महत्त्वाकांक्षी असणार्‍या मोदी-शहांना चांगले माहीत आहे. या निवडणुकीत कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात आले नव्हते. तेव्हाच स्पष्ट झाले होते की, पुन्हा सत्ता आल्यास हिमंता बिस्वा सरमा हेच मुख्यमंत्री असतील.
     
       सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असे सांगितले होते. 1996 साली पहिल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. तीही निवडणूक त्या काळी मोठं नाव असणारे भृगूकुमार फुकन या असोम गण परिषदच्या नेत्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते लढले. त्यांची राजकीय कारकीर्द मात्र त्यापूर्वीच 1994 साली सुरू झाली होती. तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी ते अध्यक्ष असलेल्या विद्यार्थी व युवकांच्या संदर्भातील समितीवर सरमा यांना सचिव म्हणून घेतले होते. 2001 साली ते ज्या जालूकबारी मतदारसंघातून पराभूत झाले होते, तिथूनच फुकन यांना पराभूत करून ते विजयी झाले. तेव्हापासून आजतागायत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. लगेचच 2002 मध्ये मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी त्यांना मंत्रिपद दिले. त्यांचा कामाचा आवाका पाहून त्यांना उत्तरोत्तर महत्त्वाची मंत्रिपदे दिली गेली. गोगोई यांची सावली म्हणूनच त्यांचा वावर होता. ते गोगोईंचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. परंतु तरुण गोगोई यांनी आपले चिरंजीव गौरव गोगोई यांना पुढे आणायला सुरुवात केली. त्यामुळे सरमा अस्वस्थ झाले असे सांगितले जाते. पण ते अर्धसत्य आहे. सरमांचा डोळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर होता. आणि ते त्यांनी कधी लपवून ठेवले नव्हते. 2013 मध्ये गोगोई यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी करणार्‍या 79 पैकी 31 आमदारांच्या सहीचे पत्र त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे दिले होते. हा दोघांमधील विवाद सोडविणे हे दिसते तेवढे सोपे काम नव्हते. नेतृत्वाचा गोगोई यांच्याकडे असलेला कल आणि 2014 मध्ये राष्ट्रीय राजकारणातील परिवर्तन पाहून बदलणार्‍या वार्‍याचा वेध सरमा यांनी घेतला व ते भाजपवासी झाले. त्यांच्या भाजप प्रवेशाला सर्बानंद सोनोवाल व केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांचा विरोध होता. पण सरमा यांची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य पाहून सरमांचे भाजप नेतृत्वाने स्वागत केले.
     
       हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री होण्याआधीच राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसवली आहे. किंबहुना त्यामुळेच ते मुख्यमंत्रिपदी बसले आहेत. 2002 पासूनच आरोग्य, शिक्षण, नियोजन व वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचा त्यांनी कारभार सांभाळला आहे. आसाममध्ये आपल्या कारकिर्दीत 8 वैद्यकीय महाविद्यालये त्यांनी सुरू केली.
     
       निवडणुकीदरम्यान मास्क घालायची गरज नाही, कोरोना संपला आहे’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. पण आरोग्यमंत्री म्हणून मागच्या वर्षी कोरोनावरील उपाययोजनांचे अत्यंत उत्तम नियोजन त्यांनी केले. त्यांचा सल्ला केंद्र सरकारने घेतला असता तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जो हाहाकार माजवला आहे तो कदाचित टाळला गेला असता. महिलांसाठी त्यांनी प्रभावी कल्याणाकरी योजना राबवल्या आहेत. ज्याप्रमाणे नीतिशकुमार यांनी महिला मतदारवर्ग आपल्या पाठीशी उभा केला, तेच मॉडेल सरमा आसाममध्ये राबवत आहेत. 2002 पासून मंत्रिपदी असल्यामुळे त्यांची प्रशासनावर पकड आणि वचक आहे.
     
       दिल्लीस्थित आणि आसामधील मीडियाने त्यांची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा तयार केली आहे. आसाममधील एक मीडिया ग्रुप त्यांच्या पत्नीच्याच मालकीचा आहे. त्यामुळे उत्तम प्रशासन आणि त्याला साजेसे मीडिया नॅरेटिव्हयाचा प्रभावी मेळ त्यांनी घातला आहे. भारतातील अनेक प्रभावी राजकारणी क्रिकेट व्यवस्थापनात दिसतात. सरमा देखील त्यास अपवाद नाहीत.
     
       2002 पासून ते आसाम क्रिकेट मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. बॅडमिंटन असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष आहेत. आसाममध्ये सत्तेचे असे एकही केंद्र नाही, जिथे हिमंता बिस्वा सरमा यांचा प्रभाव नाही. भाजप अंतर्गत गव्हर्नन्स व राजकारणाचे स्वतःचे एक मॉडेल हिमंता बिस्वा सरमा उभे करतील हे निश्चित. भाजपमध्ये त्यांना शह देऊ शकेल, असा सोनोवालसह एकही नेता नाही. तो ते निर्माण होऊ देणार नाहीत. राजकारणात पोकळी राहत नाही. त्यामुळे विरोधी पक्षातून त्यांना विरोध करणारा चेहरा भविष्यात पुढे येईलही. परंतु आगामी 20-30 वर्षांत केवळ आसामच नाही तर ईशान्य भारताच्या राजकारणावर बरी-वाईट अशी अमिट छाप हिमंता बिस्वा सरमा निर्माण करतील यात शंका नाही.
     
    सौजन्य : दैनिक पुढारी
    भाऊसाहेब आजबे /15 मे 2021
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 64