जागतिक महासागर दिन : ८ जून
- 09 Jun 2021
- Posted By : study circle
- 235 Views
- 0 Shares
जागतिक महासागर दिन : ८ जून
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”महासागर व समुद्र” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात जागतिक महासागर दिन : ८ जून व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
२.१ भूरुपशास्त्र -
* भूमीस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरुप चक्र संकल्पना, सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरूपे
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
जागतिक महासागर दिन : ८ जून
* जगाच्या इतिहासात ८ जूनला विशेष महत्त्व आहे. संयुक्त राष्ट्रांनी ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यास सुरुवात केली आणि ही परंपरा आजतागायत सुरु आहे.
जागतिक महासागर दिनाचा इतिहास -
* महासागर संरक्षिले जावेत व त्यांची नैसर्गिकदृष्ट्या काळजी घेतली जावी या उद्देशाने, जागतिक महासागर दिवस सुरुवातीला केवळ कॅनडामध्येच साजरा केला जात होता.
* १९९२ साली समुद्रातील प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यात यावी या संदर्भात ब्राझीलमधील रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक वसुंधरा शिखर परिषदेत कॅनडाने जागतिक महासागर दिनासंदर्भातला प्रस्ताव मांडला आणि हा दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले.
* ५ डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत ८ जून हा दिवस जागतिक महासागर / समुद्र दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार आणि समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
* युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे द ओशन प्रोजेक्ट या अमेरिकन संस्थेच्या जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले आहे.
२०२१ वर्षाची थीम -
* यंदाच्या महासागर दिनाची थीम द ओशन : लाइफ अँड लाइव्हलीव्हिटीज अशी आहे. २०२१ ते २०३० या दशकात शाश्वत विकासासाठी समुद्र विज्ञान विकासाशी संबंधित अशी थीम आहे. महासागर अर्थात समुद्र आपल्या पोटात त्यांच्या आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या जीवांना सामावून घेतो, त्यांचे पोषण करतो. तसेच आपल्या किनार्यावर विविध प्रकारच्या वनस्पतींचे पोषण संरक्षण करतो. विशेषतः मानवजातीला जल, वायू, तेल, खनिज संपत्ती औषधे सारख्या अनेक मार्गांनी उपयोगी पडतो रोजगार देतो.
जागतिक महासागर दिन का साजरा केला जातो ?
१) प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनात समुद्राची महत्त्वाची भूमिका आहे.
२) मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याचे काम समुद्र करतो.
३) यानिमित्ताने समुद्र बचावाची जगभरात एक चळवळ उभारली जावी.
४) समुद्रांचा शाश्वत विकास साधण्यासाठी जगातील लोकांना उद्युक्त करणे.
५) औषधी, अन्न, पाणी व प्राणवायू यासाठी समुद्र हा एकमेव मोठा स्रोत आहे, हे जाणून त्याकडे लक्ष पुरविणे.
समुद्री संपत्तीचे जतन व संवर्धन करणे हा हेतू -
* “समुद्रांच्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी अधिक भार आपण समुद्रांवर लादतो आहोत. समुद्रात मोठ्या प्रमाणावर मिसळले जाणारे अशुद्ध पाणी, प्लास्टिकचा प्रचंड मोठा कचरा यामुळे सागरी जीवन व समुद्रच धोक्यात आले आहेत. भविष्यात समुद्राचे जीवन वाचविण्यासाठी आजच समुद्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
समुद्रच बेपत्ता -
* पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या हानीमुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे पृथ्वीवरील एक अख्खा समुद्रच बेपत्ता झाला आहे. मध्य आशियातील कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान असलेला अरल समुद्र वाळवंटात रुपांतरित झाला आहे.
काही तथ्य आणि आकडेवारी -
१) पृथ्वीवरील ९७ टक्के जलसाठा समुद्रात आहे.
२) समुद्रावर तब्बल ३ अब्ज लोक अवलंबून आहेत
३) जगभरात, समुद्र व सागरी संसाधने आणि त्यावर अवलंबून असलेल्या बाजारपेठांचे मूल्य प्रतिवर्षी तीन ट्रिलियन डॉलर अर्थात जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ टक्के आहे.
४) सुमारे ३० टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास अप्रत्यक्षपणे थेट मदत होते.
५) सागरी मासेमारीवर जगभरात तब्बल २०० दशलक्ष लोक अवलंबून आहेत.
* वाढत्या जागतिकीकरणासोबतच प्रदुषणाचं प्रमाणही वाढ आहे. केवळ जमिनीवरच नव्हे तर नदी, कालवे, समुद्र यांमधील प्रदुषणाचं प्रमाणही वाढतांना दिसत आहे.
* जागतिक महासागर दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक एकत्र येऊन समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच समुद्रांची योग्य काळजी घेतली नाही तर समुद्रीजीवदेखील नष्ट होऊ शकतात. म्हणूनच, १० लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला समुद्राची काळजी घेणं गरजेचं आहे.
* समुद्र हा वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पण प्लास्टिकचे प्रदूषण, कचरा तसेच दूषित गढूळ आणि केमिकल युक्त पाणी प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे.
टक्कर दोन महासागरांची -
१) पृथ्वीचा गोल अवकाशातून पाहिला तर जवळपास ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. तो ७१ टक्के भाग म्हणजे एक महासमुद्र आहे. महासमुद्र जरी एक असला तरी त्या त्या भागातील भौगोलिक स्थिती, पाण्याच्या प्रवाहाची दिशा आणि गती, शेजारील देश, ऐतिहासिक घटना आणि वैज्ञानिक माहिती या गोष्टी गृहीत धरून त्या त्या महासमुद्रांची नावं ठेवली गेली.
२) हिंदी महासागर (इंडियन)नावाला १९६० च्या दशकात इंडोनेशिया व पाकिस्तानने विरोध दर्शवत याचे नाव इंडोनेशियन किंवा एशियन करावे म्हणून आग्रह धरला होता.
३) समुद्र म्हणजे इंग्लिशमध्ये ओशियन. हा इंग्लिश शब्द मुळात लॅटिनमधून आलेला. मूळ शब्द आहे ओकियानॉस. या शब्दाचा अर्थ आहे,पाण्याचा एक अतिविशाल प्रवाह जो पृथ्वीच्या गोलाच्या परिक्रमा करतो.
महासागरांचा अवाढव्य आकार -
* महासमुद्रांची सीमा ठरवण्यासाठी सन १९१९ मध्ये २४ देशांनी मिळून एक समिती स्थापन केली. या समितीने सीमा निश्रि्चत करत मान्यता दिली. सीमांचे पुनरावलोकन १९२८, १९२७, १९५३ आणि २००२ मध्ये करण्यात आले आणि एकूण पाच महासमुद्र ठरवले गेले. ते असे :
१) पॅसिफिक (६ कोटी, ४० लाख वर्ग मैल)
२) अटलांटिक (३ कोटी, २० लाख वर्ग मैल)
३) हिंदी (इंडियन) (२ करोड, ८० लाख वर्ग मैल)
४) अंटार्क्टिक (२ करोड ३ लाख वर्ग मैल)
५) आर्क्टिक (५० लाख वर्ग मैल)
* पॅसिफिक आणि अटलांटिक यांचे दोन दोन भाग करून उत्तर पॅसिफिक व उत्तर अटलांटिक आणि दक्षिण पॅसिफिक व दक्षिण अटलांटिक अशी नावं सोयीसाठी तयार केल्यामुळे आणखी २ महासागर तयार झाले. म्हणजेच पृथ्वीवर सात महासमुद्र आहेत.
अटलांटिक आणि पॅसिफिक महासमुद्र हे एकमेकांत मिसळत नाहीत -
* अटलांटिक आणि पॅसिफिक महासमुद्र हे एकमेकांत मिसळत का नाहीत. त्याची कारणं -
१) वेगवेगळे गुणधर्म पाण्याची घनता,
२) पाण्याचा (केमिकल प्रॉपर्टी) रासायनिक गुणधर्म,
३) क्षारांचे प्रमाण,
४) टेनसाईल स्ट्रेंग्थ,
५) भौतिक आणि जैविक गुणधर्म,
६) इनर्शिया इफेक्ट.
* द्रवाच्या घनता ज्यावेळी वेगवेगळ्या असतात. त्या एकमेकांत मिसळण्यास वेळ लागतो. त्यांचे अणू रेणू यांची रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी ते दोन्ही ठराविक काळ एकत्र राहणे जरुरी असते. इथं ही प्रक्रिया घडायला वेळच नसतो. प्रत्येक महासमुद्र आणि समुद्र यांच्या पाण्याला एक गती असते. पाण्याचा प्रवाह वाहता असतो. त्याला वॉटर करंट असं संबोधतात. त्याची गती ही त्या त्या भौगोलिक, भौतिक परिस्थितीनुसार वेगवेगळी, बदलणारी असते. पाण्याचे रंगही वेगवेगळे दिसतात कारण क्षार प्रमाणात आणि रासायनिक गुधर्मातील बदलामुळे रंग वेगळा दिसतो. दोन्ही पाण्यात जेंव्हा एका पेक्षा दुसर्याची कमीत कमी पाचपट क्षारता प्रमाण जास्त असते तेंव्हा त्या दोन्ही पाण्यातील रंगांतील फरक मानवी डोळ्यांनी पाहू शकतो.
* प्रवाह तयार होतात तरी कसे..?
१) पृथ्वीला जर आपण सूर्यावर जाऊन पाहिले तर ती अक्षावर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे फिरत असलेली दिसेल. म्हणजेच पृथ्वीला जर उत्तर ध्रुवावरील अवकाशातून पाहिले तर पृथ्वी घड्याळाच्या काट्यांच्याविरुद्ध दिशेने फिरताना दिसेल.
२) पृथ्वी जेंव्हा अक्षावर फिरत असते तेंव्हा सगळे महाद्वीप, महासमुद्र त्याच गतीने फिरत असतात. जो जमीनीचा भाग आहे तो तर स्थिर आहे. तो पृथ्वीच्याच गतीने फिरणार. पण समुद्राचे पाणी तरंगते असल्याने त्याची गती जरी तीच असली तरी ते थोडे मागे राहते. पाणी पृथ्वीच्या वेगाने ओढले जाते. त्यालाच इनर्शिया इफेक्ट म्हणतात.
३) पाणी असो व हवा नेहमी गरम तापमानाकडून थंड तापमानाकडे प्रवाहित होतात. हा नैसर्गिक गुणधर्म आहे. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांकडे हे पाणी सतत विषुववृत्तीय भागातून प्रवाहित होत असते. हा पाण्याचा प्रवाह दोन्ही ध्रुवांकडे एकमेकांविरूद्ध दिशेने सुरू असतो.
४) पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगामुळे या पाण्याच्या दोन्ही दिशा काटकोनात एकत्र मिळून यांना एक चक्री गती मिळते. मग या दोन्ही चक्रीची दिशा परस्परविरोधी होतात.
५) पाण्याच्या घनतेनुसार यागतीत फरक पडलेला असतो. असे दोन वेगवेगळ्या गतीचे, परस्परविरोधी दिशेत फिरणारे आणि वेगवेगळ्या घनता, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माचे समुद्र एकमेकाला भिडतात पण एकमेकांत मिसळत नाहीत. त्यांना एकमेकांत मिसळायला वेळच मिळत नाही.
जगात अशी १५ ठिकाणे...
* जगात अशा किमान १५ ठिकाणी नद्या व समुद्र, महासागर यांच्याबाबत घटना घडतात. भारतात कन्याकुमारी या ठिकाणी दोन समुद्र, तर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी या नद्यांच्या संगमावर बर्याच अंतरापर्यंत नदीचे दोन्ही प्रवाह स्वतंत्र दिसतात. नद्या एकाच दिशेने प्रवाहित असल्याने काही अंतर जाऊन मिळतात. महासागरांचे मात्र तसे होत नाही.
सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
८ जून २०२१ / बाळासाहेब पाटोळे