शिवस्वराज्य दिन : ६ जून
- 08 Jun 2021
- Posted By : study circle
- 218 Views
- 0 Shares
शिवस्वराज्य दिन : ६ जून
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”महाराष्ट्राचा इतिहास“ या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात ”युगप्रवर्तक शिवराय” व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
१.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक) -
* महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
युगप्रवर्तक शिवराय
* ६ जून २०२१ हा दिवस राज्य शासनाने शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला.
* ६ जून १६७४. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. रायगडाच्या साक्षीनं मराठा साम्राज्याला आपला राजा मिळाला. माँसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेत रयतेचे राजे शिवबा स्वराज्याचे छत्रपती बनले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं वर्णन करताना ऋषी भारद्वाज यांनी जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी (वाल्मीकी रामायण, युद्धकांड, सर्ग १२४, श्लोक १७) असे गौरवोद्गार काढले होते. तेव्हापासून राष्ट्र हे मातृस्वरूप बनले, भारत ही देखील सर्वांसाठी माता झाली. भारद्वाज यांचे हे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांनाही तंतोतंत लागू होते. राज्यभिषेकानंतर शिवराय शककर्ते झाले. ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती.
* स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याची प्रेरणा पुढे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रज्वलित झाली, त्यामुळे शिवाजी महाराज अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान बनले. राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या प्रेरणेच्या बळावर बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याला धक्का दिला. शिवाजी महाराज हे खर्या अर्थानं देशाचे नायक होते. या देशातील मातीच्या कणाकणांमध्ये शिवप्रेरणा आहे.
* शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली उभं केलेलं आरमार सर्वाधिक अभेद्य होतं पण दुर्दैवानं इतिहासानं त्याची फारशी दखल घेतली नाही. महाराजांच्या आरमाराची धडकी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांना देखील घेतली होती. याच यंत्रणेनं फिरंगी जहाजांपासून आपलं अनेक वर्ष संरक्षण केलं. महाराजांनी समुद्रामध्ये किल्ले उभारून किनारपट्टी सुरक्षित केली.
* मराठ्यांच्या घोडदळाचा देशभर दबदबा होता. याच बळावर त्यांनी बंगालमधील मुर्शिदाबाद आणि त्यानंतर कटक, चांदा आणि संबळपूरपर्यंत धडक मारली. मराठा सैन्य १७४० मध्ये दक्षिणकडे अरकोटपर्यंत पोचलं होतं. येथे परकीयांना ताब्यात घेतलेला मोठा भूभाग मराठा सैन्याने स्थानिकांना मिळवून दिला. मराठा सैन्याने त्यावेळी गाजविलेले शौर्य खरोखरच अतुलनीय होतं. उत्तरेमध्ये १७५८ साली मराठ्यांनी दिल्लीपर्यंत झेप घेत अफगाणी आक्रमकांना धूळ चारली. पेशवा बाजीराव (पहिले) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा पराक्रम गाजविला. यावेळी मध्यभारत आणि राजपुतानामध्ये मराठ्यांचे अश्व तुफान वेगाने दौडत होते. पठाण आक्रमकांना जबर मार देत मराठ्यांनी अटक आणि नंतर पेशावरपर्यंत धडक मारली. मराठे पानिपतचे तिसरे युद्ध जिंकले असते तर ब्रिटिशांना भारतात पायही ठेवता आला नसता.
* पुढे जवळपास शंभर वर्षांनी ब्रिटिशांशी दोन हात करताना लोकमान्य टिळकांनी स्वराज्यची हाक दिली. “स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे त्यांचे उद्गार जगभर गाजले. स्वातंत्र्यानंतर देखील आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये हीच शिवप्रेरणा महत्त्वपूर्ण ठरली. शिवाजी महाराजांशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामातील सर्व आदर्श गुणांचा समुच्चय आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक देशवासीयांच्या मनातील शिवाजी महाराजांचे स्थान अढळ आहे. काही इतिहासकारांनी मराठा हा शब्द जात आणि प्रांतापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला पण शिवरायांचे स्वराज्य हे खर्या अर्थाने अठरापगड जातीचे राज्य होते. ते रयतेचे राज्य होते. या स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रत्येकजण प्राणपणाने लढला. कारण प्रत्येकाला हे ठावूक होतं की आपण शिवराष्ट्र अन स्वराज्यासाठी लढत आहोत.
सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
६ जून २०२१ / अरुण तिवारी