स्वातंत्र्यवीर सावरकर

  • स्वातंत्र्यवीर सावरकर

    स्वातंत्र्यवीर सावरकर

    • 02 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 369 Views
    • 0 Shares
    स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात इतिहास घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर’ व त्यांच्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास
     
    १.६   ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव -
    १.६.२  क्रांतीकारी चळवळी - महाराष्ट्रातील बंड - अभिनव भारत
    १.९   सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी -
          हिंदू महासभेचे राजकारण.
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक -
          त्यांची विचारप्रणाली व कार्य - विनायक दा. सावरकर
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
         स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीइतकेच समाजसुधारणेच्या क्षेत्रातील सावरकरांचे कार्य लक्षणीय आहे. त्यांचा बुद्धिवादही जाणून घ्यायला हवा. २१ व्या शतकात युवकांनी त्यांचे हे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. २८ मे रोजी  सावरकरांची जयंती साजरी झाली.

     

     *   स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा बुद्धिवाद, त्यांचे समाज सुधारणांविषयीचे विचार यांची प्रस्तुतता आज प्रकर्षाने जाणवते आहे. त्यांचा राष्ट्रवाद हा मानवतेकडे नेणारा होता, तो संकुचित नव्हता. त्यांची विज्ञाननिष्ठा नीट समजून घेतली पाहिजे. वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानाचा विकास, यांत्रिकीकरण म्हणजे विज्ञाननिष्ठा नव्हे. आपल्या सदसद्विवेकबुध्दीचा उपयोग करून एखाद्या गोष्टीची निष्कर्ष काढायची पध्दत किंवा प्रक्रिया म्हणजे विज्ञाननिष्ठा. शोधक, जिज्ञासू व चिकित्सक वृत्तीने एखादी गोष्ट बुद्धी व तर्काच्या कसोटीवर पडताळून मिळणार्‍या निष्कर्षाला मोकळ्या मनाने स्वीकारणे, याला विज्ञाननिष्ठेची कार्यपद्धती म्हणता येईल, असे सावरकर स्पष्ट करतात. कुठलीही गोष्ट चांगली की वाईट ह्यासाठी ते ‘राष्ट्रहित व मनुष्यहित’ हा मापदंड लावतात. भारतीय राज्यघटनेनेही कलम ५१ अ (ह)द्वारे भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात वाढ केली आहे; त्यानुसार ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन’, मानवतावाद, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. म्हणजे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार हे घटनेलाही अनुकूल आहेत. प्रत्येक राष्ट्राने विज्ञाननिष्ठा अंगीकारून दुसर्‍याच्या न्याय्य, नागरी, मानवाधिकारांवर व स्वातंत्र्यावर गदा न आणता आपापला विकास केला तर अंतिमत: मानवाचेच कल्याण होईल.

     
        मानवतावादाकडे -
     
    *   ‘गाय अल्ड्रेड’ यांना दिनांक २९ एप्रिलला १९४७ ला पाठविलेल्या उत्तरात सावरकर म्हणतात, ‘माझ्या अलीकडील लेख नि भाषणांवरून आपणाला वाटेल की, मी आता संकुचित राष्ट्रवादी झालो आहे. मानवाची प्रगती राष्ट्रवाद नि संघराज्य ह्या मार्गाने व्हावी, असे माझे मत असले तरी ह्या सर्वांचे म्हणजेच मानवजातीचे अंतिम राजकीय ध्येय मानवता हेच असले पाहिजे, राष्ट्रवाद हे असू नये. सर्व राजकीय कला आणि शास्त्र यांचे अंतिम ध्येय मानवराज्य हेच असले पाहिजे. पृथ्वी हीच आपली माता नि मानवजात हेच आपले राष्ट्र. तुमचीही हीच विचारधारा असल्याने आपण दोघे बंधू बंधू आहोत असे मला वाटते.’ ‘ऐक भविष्याला’ या कवितेत सावरकरच म्हणतात- होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदु जाती चालली रणाला म्हणजे स्वतः मुक्त होऊन, जगताला मुक्त करण्याचे मानवतेच्या स्वातंत्र्याचे सावरकरांचे स्वप्न होते. पण, भव्य कल्पना व कविमनाचे सावरकर हे वास्तववादी होते. त्यामुळे मानवतेचे स्वप्न साध्य करण्यासाठी राष्ट्रवादाची पायरी चढून जाणे अपरिहार्य आहे, हे त्यांनी ओळखले होते.
     
    *   ‘मानवजातीचे ऐक्य साधण्याचा पक्ष मांडण्यापूर्वी, एक राष्ट्रीय किंवा सामाजिक संघ टिकून राहण्यास आपण सर्व समर्थ आहोत हे तुम्ही आधी सिद्ध करून दाखविले पाहिजे.” (समग्र सावरकर वाङ्मय- खंड ६, पृष्ठ ९७) म्हणून सावरकरांचा राष्ट्रवाद हा मानवतावादाशी सुसंगत व अविरोधी आहे. ब्रिटिश गृहखात्याच्या गोपनीय अहवालातील नोंद पाहणेही आवश्यक आहे. २१ ऑक्टोबर १९३९ ला रात्री ९.२५ वाजता परळ नवरात्र उत्सवात १५०० लोकांसमोर (ज्यात ५०० महिला होत्या) सावरकरांनी ‘हिंदूंची सद्यस्थिती व कर्तव्ये’ ह्या विषयावर मराठीत भाषण दिले. त्याची नोंद पुढीलप्रमाणे- ‘त्यांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी ह्या सर्व भारतीयांना राजकीय, सामाजिक, नागरी आणि धार्मिक क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत हे त्यांचे राजकीय उद्दिष्ट होते... त्यांनी खर्‍या आदर्श राष्ट्रवादाचे समर्थन केले आणि जगा व इतरांना जगू द्या ही त्याची तत्त्वे होती. इतर समुदाय जे मागत आहे त्यापेक्षा अधिक ते काही मागत नाहीत. म्हणजे थोडक्यात ते काहीच मागत नाहीत.’
     
    *   सावरकरांनी तात्कालिक धोरण म्हणून जरी राष्ट्रवादाचा पुरस्कार केलेला असला तरी त्यांचे आदर्शवादी धोरण मानवता हेच होते. सावरकरांनी जागतिक शासननिर्मिती, मानवता हा एकच धर्म, पृथ्वी हे एकच राष्ट्र हे सर्व राजकारणाचे व समाजकारणाचे अंतिम ध्येय सांगितले होते. सावरकरांच्या विचारांचा हाच गाभा होता. त्यामुळे सावरकरांचे विचार आजही मानवतेसाठी अत्यावश्यक आहेत.
     
        सामाजिक विचार -
     
    *   धनंजय कीर म्हणतात, ‘सुधारक जुन्याच बांधकामाची पुनर्बांधणी करतो, तर क्रांतिकारक जुनी इमारत उद्ध्वस्त करतो व नव्याची उभारणी करतो. सावरकर हे नुसते समाजसुधारक नव्हते, तर ते एक कृतिशील समाजक्रांतिकारक होते. त्यांना विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद, समता, उपयुक्तता, व्यवहार्यता आणि मानवता या मूलभूत तत्त्वांवर समाजाची रचना वा उभारणी करायची होती. सावरकर म्हणतात, ‘धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस गेले!... या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करावयाची ती प्रत्यक्ष ऐहिक आणि वैज्ञानिक अशा तत्वांवर उभी केली पाहिजे.’ (समग्र सावरकर वाङ्मय- खंड ३)
     
    *   १९२३ मध्ये तुरुंगात असताना सावरकरांचं ’हिंदू नॅशनॅलिझम : हिंदुत्व, हू इज अ हिंदू’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ’हिंदुत्व’ या शब्दाला पुढे खूप प्रसिद्ध मिळाली. भाजप आणि आरएसएसनेही सावरकरांचं हिंदुत्व स्वीकारलं आणि अडवाणीही याच आधारावर पुण्यभूमी-जन्मभूमीच्या गोष्टी करत असत.
     
    *   १९३० च्या सावरकर राजकीय परिघात दशकात येतात. हा काळ दुसर्‍या महायुद्धाचा होता. या दरम्यान सावरकर इटली आणि जर्मनीचा मोठ्या प्रमाणात बचाव करत होते. सावरकरांना १९३७ मध्ये हिंदू महासभेचं अध्यक्ष बनवण्यात आलं आणि ते १९४२ पर्यंत अध्यक्षपदी होते. त्यांच्या अध्यक्षपदादरम्यान भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप संवेदनशील घटना घडत होत्या. वैचारिक स्तरावर आरएसएस आणि हिंदू महासभेत घट्ट संबंध होते. हे संबंध अशा प्रकारेही समजले जाऊ शकतात की, आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार १९२६ ते १९३१ पर्यंत हिंदू महासभेचे सचिव राहिले होते.
     
    *  सावरकरांची भाषणं दोन मुख्य मुद्द्यांवर असतं. एक आंतरराष्ट्रीय स्थिती आणि दुसरा मुद्दा हिंदू-मुस्लीम संबंध.  तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सावरकर जेव्हा राजकारणात आले, तेव्हा तो काळ रोम-बर्लिन अ‍ॅक्सिस आणि यात जपानच्या सहभागाचा होता. म्हणजे, इटली आणि जर्मनीतली फॅसिस्ट सरकारं आणि जपानच्या सोबत येण्यासाठी १९३६ मध्ये करार झाल होता. असं म्हटलं जातं की, या महत्त्वाच्या घटनांना हिंदू महासभा आणि हिंदू अतिराष्ट्रवाद्यांनी आपल्या बाजूला घेतलं.
     
    *   १ ऑगस्ट १९३८ रोजी सावरकरांनी पुण्यात जवळपास २० हजार लोकांच्या गर्दीसमोर भाषण दिलं होतं. या भाषणात त्यांनी जर्मनीतला नाझीवाद आणि इटलीतला फॅसिझम यांचं समर्थन करत म्हटलं होतं की, भारताने कुठल्याच वादाला विरोध किंवा समर्थन करू नये. जर्मनीला नाझीवाद आणि इटलीला फॅसिझमच्या मार्गवर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. आताच्या काळात त्यांना जे योग्य वाटलं, ते त्यांनी निवडलं आहे. बोल्शेविक रशियाला योग्य वाटतंय आणि ब्रिटनला लोकशाही. (हिंदू महासभेच्या बॉम्बे ऑफिसमधून जारी केलेली प्रेस नोट.)
     
    *  जर्मनीतल्या नाझीवाद आणि इटलीतल्या फॅसिझमच्या समर्थनादरम्यान सावरकरांनी पंडित नेहरूंवरही टीका केली होती. सावरकर पुण्यातीलच भाषणात म्हणाले होते की, कुणी कुठलं धोरणं अवलंबावं, हे जर्मनी, जपान, रशिया आणि इटलीला सांगणारे आपण कोण आहोत? फक्त एवढ्यासाठी की आपली विशिष्ट धोरणाशी अकादमिक प्रेम आहे? जर्मनीसाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे, हे नेहरूंपेक्षा हिटलरला जास्त चांगलं माहित आहे, हे उघड आहे. जर्मनी आणि इटली, नाझीवाद आणि फॅसिझमनंतर जास्त शक्तिशाली झाले, हे तथ्य आहे. दोन्ही विचारधारा त्यांच्यासाठी जादूच्या कांडी आणि त्यांच्या दृष्टीने टॉनिक म्हणून सिद्ध झाल्यात.
     
    *   सावरकरांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की, आपल्या गरजेनुसार भारत कुठल्याही विशिष्ट पद्धतीच्या सरकारला स्वीकारू किंवा नाकारू शकतो. मात्र, पंडित नेहरू जर्मनी आणि इटलीविरोधात सर्व भारतीयांचं प्रतिनिधी बनून उभे राहतात. पंडित नेहरू काँग्रेसच्या एका गटाकडून भलेही विरोध करत असतील. नेहरूंनी याबाबत स्पष्ट केलं पाहिजे की, ते जर्मनी, इटली, जपान आणि इतर देशांसाठी आपली दुर्भावना व्यक्त करतात, तेव्हा कोट्यवधी सनातनी हिंदू लोक त्यांच्या बाजूने नसतात.
     
    *   सावरकरांच्या अध्यक्षतेत हिंदू महासभेचा मुस्लिमविरोधी अजेंडा समोर आला होता. दुसरीकडे, ज्या नाझीवादाचं सावरकर समर्थन करत होते, तो नाझीवाद अल्पसंख्यांक ज्यू लोकांविरोधात अत्याचार आणि द्वेषाला खतपाणी घालत होता. सावरकरांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये हिटलरच्या ज्यूविरोधी अजेंड्याचं समर्थन केलं आहे.
     
    *  १४ ऑक्टोबर १९३८ रोजी सावरकरांनी भारतात मुस्लिमांबाबत म्हटलं होतं की, एखादा देश तेथील बहुसंख्यांक लोकसंख्येतून बनतो. जर्मनीत ज्यू काय करतायेत? ते अल्पसंख्यांक आहेत आणि त्यांनी जर्मनी सोडली पाहिजे. जर्मनीमध्ये जर्मन लोकांचं राष्ट्रवादी आंदोलन आहे, मात्र ज्यू लोक तिथं धार्मिक आहेत. राष्ट्रीयत्व भौगोलिक क्षेत्रावर आधारित असू शकत नाही, तर राष्ट्रीयत्वाचा संबंध वैचारिक, धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक एकतेशी आहे. अशावेळी एक राष्ट्र म्हणून जर्मन आणि ज्यू सोबत राहू शकत नाहीत.
     
    अधिक माहितीसाठी पाहा -
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 369